फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE 12th reevaluation Result 2026: सीबीएसई (CBSE) १२ वीचे पुनर्मूल्यांकन झारखंडमधील रांचीची रहिवासी असलेल्या अवनी केजरीवाल हिच्यासाठी अत्यंत खास ठरले आहे. सीबीएसई १२ वी बोर्ड परीक्षा २०२६ च्या पुनर्मूल्यांकन निकालात अवनीने तब्बल ५०० पैकी ५०० पूर्ण गुण मिळवले आहेत. जेव्हा बोर्ड परीक्षेचा पहिला निकाल लागला, तेव्हा तिचे इंग्रजी आणि बिझनेस स्टडीज (Business Studies) या विषयांत अपेक्षेपेक्षा कमी गुण आल्याचे तिच्या निदर्शनास आले. इंग्रजीत तब्बल १९ गुण कमी मिळाल्याने तिला धक्काच बसला होता, कारण हा तिचा आवडता आणि सर्वात मजबूत विषय होता. याच कारणामुळे तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता.
अवनीचे म्हणणे आहे की, गुण वाढतील अशी तिला नक्कीच आशा होती, पण पूर्ण ५०० गुण मिळतील अशी तिने कल्पनाही केली नव्हती. पुनर्मूल्यांकनानंतर तिच्या इंग्रजीत १९ गुण आणि बिझनेस स्टडीजमध्ये ५ गुण वाढले. अशा प्रकारे तिच्या एकूण गुणांमध्ये २४ गुणांची भर पडली आणि तिचा स्कोअर ५०० पैकी ५०० झाला.
अवनीने तिच्या पाच मुख्य विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. यामध्ये इंग्लिश कोर, अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स आणि अप्लाइड मॅथेमॅटिक्स या विषयांचा समावेश आहे. याशिवाय, अतिरिक्त विषय असलेल्या ग्राफिक्समध्येही तिला ९९ गुण मिळाले आहेत. या नेत्रदीपक कामगिरीनंतर अवनी राज्यातील अव्वल विद्यार्थ्यांच्या यादीत सामील झाली आहे.
अवनी रांचीच्या धुर्वा येथील ‘डीपीएस सेल टाउनशिप स्कूल’ची (DPS Sail Township School) विद्यार्थिनी आहे. तिचे वडील मितेश केजरीवाल हे व्यावसायिक असून, आई पूनम केजरीवाल गृहिणी आहेत. अवनी सुरुवातीपासूनच अभ्यासाबाबत अत्यंत गंभीर आणि कष्टाळू असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. तिने नेहमीच शिस्त आणि जिद्दीने अभ्यास केला, ज्याचा निकाल आज सर्वांसमोर आहे.
अवनीने सांगितले की, आपण परीक्षेत चांगली कामगिरी केली असून आपले गुण यापेक्षा जास्त असायला हवेत, असा तिला सुरुवातीपासूनच ठाम विश्वास होता. यामुळेच तिने उत्तरपत्रिकेची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला. पुनर्मूल्यांकनाचा निकाल आल्यानंतर तिचा हा विश्वास खरा ठरला आणि तिला ५०० पैकी ५०० पूर्ण गुण मिळाले. आपल्या या सुवर्ण यशाचे श्रेय अवनीने तिचे आई-वडील आणि शिक्षकांना दिले असून तिने बिझनेस मॅनेजमेंटच्या (Business Management) क्षेत्रात आपले करिअर करायचे ठरवले आहे.






