फोटो सौजन्य - Social Media
बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी विद्यार्थ्यांसाठी कडक सूचना जारी केली आहे. उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे स्वतःची ओळख दर्शविल्यास तो गंभीर गैरप्रकार मानला जाईल आणि संबंधित विषयाची परीक्षा रद्द होऊन विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण ठरवले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मंडळाने स्पष्ट केले आहे की उत्तरपत्रिकेत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शाळा किंवा परीक्षा केंद्राचे नाव लिहिणे, ठरलेल्या जागेशिवाय बैठक क्रमांक नमूद करणे, तसेच कोणतीही विशिष्ट खूण, चिन्ह, संदेश, प्रार्थना, विनंती किंवा चित्र काढणे हे नियमभंग मानले जाणार आहे. अशा प्रकारे ओळख पटवण्याचा प्रयत्न हा परीक्षेच्या निष्पक्षतेला बाधा आणणारा गंभीर गुन्हा समजला जातो. जानेवारी २०२० पासून मंडळाने ‘परीक्षार्थी गैरमार्ग-शिक्षा सूची’ लागू केली असून त्यात एकूण ३२ प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश आहे. परीक्षेनंतर उघड होणाऱ्या गैरप्रकारांवरही मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. उत्तरपत्रिका अनधिकृतरीत्या बाहेर नेणे, त्यात फेरफार करणे, इतरांकडून उत्तर लिहून घेणे, परीक्षकांशी संपर्क साधणे किंवा कागदपत्रांमध्ये बदल करणे यांसारख्या प्रकारांमध्ये संबंधित विषय किंवा संपूर्ण परीक्षाच रद्द केली जाऊ शकते.
याशिवाय काही गंभीर प्रकरणांना दंडनीय गुन्ह्याचे स्वरूप देण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका लीक करणे, डिजिटल माध्यमातून गैरप्रकार करणे, उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करणे किंवा लाच देणे यांसारख्या घटनांमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल होऊन सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांवर परीक्षाबंदीही लागू होऊ शकते.
विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मंडळाने विविध माहितीपर व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर उपलब्ध केले आहेत. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना नियमांची स्पष्ट माहिती देणे आणि नकळत होणारे गैरप्रकार टाळणे हा आहे. कोल्हापूर व कोकण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
मंडळाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, उत्तरपत्रिकेत कोणतीही ओळख दर्शविणे म्हणजे थेट गैरमार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






