गेल्या पंधरा वषपिक्षा अधिक काळापासून मुंबई-गोवा महामागांचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र त्यानंतर घोषणा होऊन आणि निधी मिळून अनेक महामार्गाची कामं पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पणही करण्यात आले. परंतु मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला मात्र अद्यापही लोकार्पणाचा मुहूर्त सापडलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक विलंबाने महामार्गाच्या दोन टप्प्यांचे काम सुरू असल्याने अद्यापही महामार्ग पूर्ण होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे जनतेचा संताप वाढत असून सातत्याने होणारा कामातील विलंब आणि कंत्राटदारांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्प्यात विलंब लावणाऱ्या HMPL आणि ईगल या दोन ठेकेदार कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आरवली ते कांटे या ३९ किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम एचएमपीएल या कंपनीकडे आहे.
या टप्प्याच्या कामासाठी शासनाकडून ३११ कोटी निधीची तरतूद करण्यात आली, मात्र वारंवार सूचना देऊनही कामातील विलंब थांबलेला नाही. कंपनीकडून मुदतीत काम पूर्ण न झाल्याने अखेर रस्ते विकास विभागाकडून या कंपनीला ११ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कांटे (संगमेश्वर) ते वाकेड लांजा या ४९ किलोमीटरच्या आणखी एका चौपदरीकरण टप्यामध्ये काम ईगल या कंपनीला देण्यात आले होते. या टप्प्यासाठी ५१९ कोटी रुपये निधी खर्च केला जात आहे. मात्र ईगल या चौपदरीकरणातील काम करणाऱ्या कंपनीकडूनही या टप्प्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण झालेले नाही. वारंवार सांगूनही त्यात कोणतीच प्रगती दिसून आली नाही. त्यामुळेच रस्ते विकास विभागाकडून इंगल कंपनीला पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे अन्य जिल्ह्यांमधील काम हे बहुतांशी प्रमाणात पूर्ण झालेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर दोन वर्षांपूर्वीच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. रत्नागिरीतील आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेंड या दोन टप्प्यातील कंत्राटदार सातत्याने बदलण्यात आले. या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले. ठेकेदारांकडूनही कामाकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाचा विषय लांबणीवर पडला, काम अर्धवट राहिले आहे.
गेल्याच वर्षी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून या टप्प्यातील ठेकेदारांना काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती, परंतु त्यानंतरही हे काम वेळेत पूर्ण झालेले दिसून येत नाही. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना
निर्माण झाली आहे. अजून किती वर्षे या महामार्गाचे काम सुरू राहणार आणि लोकांना किती वर्ष खड्ड्यातून गाड्या चालवाव्या लागणार आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार, असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. खड्डे आणि अरुंद रस्ते यामुळे महामार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. अनेक अपघातही झाले असून त्यामध्ये अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर अनेक जणांना अपघातातील जखमांमुळे कायमचे अपंगत्व आलेले आहे. याशिवाय महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे गणेशोत्सव व अन्य उत्सवांचा काळात वाहतूक कोंडीत जनतेला अडकून राहावे लागते आणि त्रास सहन करावा लागतो. कामाच्या नियोजनाचा अभाव आणि होत असलेला विलंब हीच त्याची कारणे असल्याचे जनतेत बोलले जात आहे.
शासनाकडून याची गंभीर दखल घेऊन ठेकेदारांवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. परंतु केवळ दंड करून ठेकेदार कामाचा वेग वाढवणार का असा प्रश्न निर्माण झाला असून दंडाच्या कारवाईवर न थांबता हे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर व्हावा, अशी जनतेची मागणी आहे.






