डॉ. विजय माने, बावी केंद्रीय शाळा, धाराशिव येथील शिक्षक, लिंगभाव जाणिवेतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.
हे पहिल्यांदा घडलेलं नव्हतं. रांगोळी स्पर्धेत डॉ. माने मुलांनाही सहभागी होण्यास प्रोत्साहन देतात. खुर्च्या आणि टेबलं उचलायची असतील तेव्हा मुलींनाही सांगतात. त्यांच्यासाठी लिंगसमानता केवळ घोषणा नाही. ती दैनंदिन सवयींची दुरुस्ती आहे. “साध्या भूमिका अदलाबदलीतून मुलांना समानतेचे धडे कोणत्याही व्याख्यानापेक्षा जास्त मिळतात, ” असं डॉ. माने यांना वाटतं. त्याचवेळी ते हेही मान्य करतात की भूमिका बदल ही केवळ सुरुवात आहे. खरी समानता तेव्हाच येईल जेव्हा मुली आणि स्त्रिया स्वतःसाठी निर्णय घेण्यासाठी सक्षम होतील.
शिक्षक होण्यापूर्वी डॉ. माने इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. त्या जगात कौशल्यच विश्वासार्हता ठरवत होते. त्यावेळी त्यांनी समाजातील लिंगभेदाबद्दल कधी जाणीवपूर्वक विचार केला नव्हता. त्यांच्या शिक्षिका जयश्री शास्त्री यांनी त्यांना शिक्षण क्षेत्रात येण्यास प्रेरित केलं. साध्या सर्वसाधारण पार्श्वभूमीतून आलेल्या माने यांनी शिक्षण पूर्ण केलं, शिक्षक म्हणून पात्र झाले आणि शाळेमध्ये शिकवू लागले. पाठ्यपुस्तकांमध्ये लिंग समभावाच्या संकल्पना होच्या मात्र प्रत्यक्ष वर्गात फारशा चर्चेत किंवा अमलात येताना दिसत नव्हत्या. त्यांच्यासाठी या बदलाची सुरुवात झाली ती धाराशिव जिल्ह्यात २०२२ पासून सुरू झालेल्या लिंग समभाव कार्यक्रमाच्या माध्यमातून. राज्य शासनाच्या सहकार्याने युनिसेफ आणि अंगाई (UNGEI) यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यात लिंग समभावावर आधारित एक अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून, त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये समानतेची जाणीव दृढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. खेळ, चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून शिकवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे मुला-मुलींमधील भेदभावाविषयीची समज बदलू लागली आहे. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला असून स्थानिक स्वयंसेवी संस्था स्वयं शिक्षण प्रयोग, कोरो आणि मावा यांनीही सहभाग नोंदवला.
“लिंगभावाचे विषय आमच्या अभ्यासक्रमात होते, पण ते मर्यादीत राहिले. लिंग समभाव प्रशिक्षणाने आम्हाला एक व्यावहारिक चौकट दिली, नुसते प्रासंगिक जनजागृती सत्र नव्हे,” डॉ. माने म्हणाले.
आज त्यांच्या वर्गात तो बदल दिसतो: बसण्याची व्यवस्था जाणीवपूर्वक मिश्र असते, क्रीडा संघा मुले-मुली एकत्रित असतात, नेतृत्वाच्या भूमिका बदलत राहतात आणि सफाई किंवा कार्यक्रम आयोजनासारखी कामे समान वाटली जातात. ते मराठी व इंग्रजीत शिकवतात, अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीतही ते असून धड्यांमधील छुपे रूढीवाद तपासतात. ते कवीही आहेत आणि आपल्या कवितांमधून लिंगसमानतेला प्रोत्साहन देतात. लिंग समभाव प्रशिक्षणातून डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची नवी पद्धत विकसित केली ती म्हणजे निर्णयापेक्षा विश्वास आणि चिंतनास प्राधान्य देणारी.
“विद्यार्थी बऱ्याचदा रूढीवादी परंपरा असलेल्या कुटुंबातून येतात. किशोरावस्थेत लिंगभाव, मैत्री आणि नातेसंबंधांचे प्रश्न गुंतागुंतीचे होतात. मी या संवादांमध्ये लिंगभावाचा दृष्टिकोन आणतो. निर्णय देण्याएेवजी, विचार करायला भाग पाडतो,” ते म्हणाले. त्यांचा दृष्टिकोन विश्वासावर आधारित आहे, भांडणावर नाही. ते मुलांचे-पालकांचे म्हणणे ऐकतात, त्यांना मार्गदर्शन करतात, मुलांना चुका मान्य करण्याची संधी देतात. “मुलांना निर्णयाची भीती नसेल तर ते मोकळेपणाने बोलतात. संवाद हीच गुरुकिल्ली आहे, आपण त्यांना सतत समानतेकडे वाट दाखवत राहिले पाहिजे.”
लिंग समभाव हे आता त्यांच्यासाठी काम राहिलेले नाही. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. दोन मुलींचे वडील म्हणून ते घरी तेच शिकवतात जे शाळेत सांगतात. घरातील जबाबदाऱ्या वाटल्या जातात. मुलींवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायचे स्वातंत्र्य त्यांनी दिले आहे.
त्यांचे स्वतःचे बालपण सर्वसाधारण ग्रामीण भागातील मुलांप्रमाणेच होते. त्यावेळी स्वतःची कामं करणं, कपडे धुणं हे लिंगजाणिवेतून नव्हे, तर गरजेतून ते करत. ” पण त्या सवयींनी मला श्रमाचा सन्मान शिकवला. तेव्हा मला लिंगसमानतेची जाणीव नव्हती, ती गरज होती. आज मला वाटते की, कामाला लिंग नसते. स्त्री-पुरुष समान कामे करू शकतात, फक्त संधीची गरज असते,” डॉ. माने म्हणाले.
लिंग समभाव कार्यक्रमाचा परिणाम दृश्यमान आहे. मावा संस्थेचे लिंग समभाव प्रशिक्षक सूरज पवार, यांनी आतापर्यंत ८७५ शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. “प्रशिक्षण तेव्हाच यशस्वी होते जेव्हा आपली मूल्यव्यवस्था मूळातून बदलते, वर्तन बदलते. डॉ. विजय माने यांच्यासारख्या अनेक शिक्षकांमध्ये मला तो बदल स्पष्ट दिसतो. ते लिंगसमानतेला केवळ सिद्धांत मानत नाहीत, तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते प्रयत्न करतात. प्रथांना प्रश्न विचारतात, चर्चा करतात, आपली बाजू मांडतात, मुलांना या संकल्पनेची जाणीव करून तरुण वयातच त्यांच्यामध्ये लिंग समानतेचं एक बीज रुजवतात, आणि आपल्या सहकाऱ्यांवरही प्रभाव टाकतात. इथल्या अनेक शाळांमध्ये आज मुला-मुलींनी एकत्र खेळणं, अभ्यास करणं, एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने बोलणं हा एक मोठा बदल दिसतो. हाच संस्थात्मक बदल मला अपेक्षित होता,” सूरज म्हणाले.
डॉ. माने यांच्यासाठी बदल शाळेच्या भिंतींपलीकडेही गेला पाहिजे. “समाजावर, मुलांवर माध्यमे आणि कुटुंब व्यवस्था अशा अनेकांचा प्रभाव असतो. शाळा एकट्याने मानसिकता बदलू शकत नाहीत. इच्छित परिणाम साधण्यासाठी आपल्याला संपूर्ण परिसंस्था बदलायला हवी,” डॉ. माने म्हणाले. आता याच ध्येयाने ते काम करतात. शाळा, गाव, समाजातील त्यांच्या संपर्कात येणारे घटक या सगळ्यांना ते लिंग समभावाचा विचार देऊ इच्छितात.
संकलन – श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार – युनिसेफ महाराष्ट्र






