एक्झिट पोल फेल ठरल्यास बंगालमध्ये कोणाचं सरकार? सत्तेसाठी भाजप आणि टीएमसीचा 'प्लान बी' तयार!
जवळपास सर्वच प्रमुख सर्वेक्षणांनुसार ही लढत इतकी अटीतटीची झाली असल्याचा अंदाज वर्तवला आहे. काही सर्वेक्षणांमध्ये भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला असला, तरी बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचणे कठीण असल्याचेही संकेत आहेत. तर दुसरीकडे, टीएमसीही बहुमताच्या जवळ पोहोचत असली, तरी स्पष्ट बहुमत मिळण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे त्रिशंकू विधानसभेची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, एक्झिट पोल्स अनेकदा अचूक ठरत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष निकालांमध्ये मोठा फरक पडू शकतो. एखाद्या पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे दोन्ही प्रमुख पक्ष बहुमतापासून दूर राहिल्यास लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
बहुतेक एक्झिट पोल्सचे कलांनुसार, बंगालमधील निवडणुकीची लढत यावेळी पूर्णपणे द्विपक्षीय झाली आहे. एका बाजूला सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष भाजप आहे, ज्याने गेल्या काही वर्षांपासून राज्यात आपली पकड मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
एबीपीसाठी घेण्यात आलेल्या मॅट्रिक्स सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपला १४६ ते १६१ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर टीएमसीला १२५ ते १४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण जर भाजपला १४६ जागां मिळाल्या तर त्यांना बहुमतापासून वंचित राहावे लागेल, ज्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे, पीएमएआरक्यूच्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसारही पश्चिम बंगालमधील अगदी चुरशीची लढत होण्याचा अंदाज आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला १५० ते १७५ जागा आणि टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
West Bengal Exit Poll 2026: ममता दीदींना धक्का, भाजप १७१ जागांसह …
विशेष म्हणजे, ॲक्सिस माय इंडियासारख्या प्रतिष्ठित पोलस्टरने यावेळी अजुनही बंगालची आकडेवारी प्रसिद्ध केलेली नाही. याचे कारण म्हणजे, अनेक मतदारांनी त्यांच्या मतदानाच्या पद्धतींबद्दल माहिती देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पीपल्स पल्ससारख्या काही सर्वेक्षणांमध्ये दोन्ही पक्षांचे आकडे इतके मिळते जुळते दिसत असल्याने कोणत्याही पक्षाचा विजय शक्य वाटत होता.
हे सर्व अंदाज पाहता, बंगालमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. बहुतेक अंदाजानुसार भाजपला १४०-१६० जागा आणि टीएमसीला १२०-१४० जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ दोन्ही पक्ष बहुमताच्या जवळ आहेत, पण त्याहून पुढे जाऊ शकत नाहीत.
जर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, कोणताही पक्ष १४८ जागांचा टप्पा ओलांडू शकत नाही, तेव्हा राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरते. सामान्यतः, राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी देतात.
जर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण बहुमत मिळवण्यात अपयशी ठरला, तर त्याला मित्रपक्षांची गरज लागेल, ज्यामुळे त्याच्या सरकारचे नियंत्रण मर्यादित होऊ शकते. टीएमसीसाठी ही विरोधी पक्षांच्या एकतेची कसोटी असेल. जर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला, तर पिछाडीवर असूनही ते पुन्हा सत्तेत येऊ शकतात.
एकंदरीत, यावेळची बंगालची निवडणूक केवळ जय-पराजयाचा खेळ न राहता, गुंतागुंतीचे गणित आणि राजकीय डावपेचांचा खेळ बनली आहे, जिथे अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार नाही.






