संग्रहित फोटो
निंबुतच्या मागील तलाठ्यावरही लाचलुचपत विभागाने कारवाई केली. त्यानंतर दोन-तीन वर्षे पूर्णवेळ तलाठी नव्हते. तेव्हा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच खासगी व्यक्ती सोमनाथ महानवर याने सरकारी कार्यालयाचा ताबा घेतला होता. नवीन महिला तलाठी आल्यानंतरही महानवरच अर्थपूर्ण व्यवहार करत होता.
निंबुतच्या शेतकऱ्याने शेतीच्या गटामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून सहा गुंठ्यांचे चार प्लॉट तयार केले होते. त्यानुसार तहसीलदारांनी सात-बारावर नोंद करण्यासाठी निंबुतच्या गाव कामगार तलाठी जयश्री तनपुरे यांना ११ फेब्रुवारीला आदेश दिले. नोंदीसाठी शेतकरी निंबुत तलाठी कार्यालयात गेल्यावर कार्यालयातील सोमनाथ महानवर याने तलाठी जयश्री तनपुरे आणि मंडल अधिकारी संतोष मोहिते यांच्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर महानवरने तसा व्हॉटसअॅप मेसेजही पाठविला.
वैतागलेल्या शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या प्राथमिक पाहणीत सोमनाथ महानवर याने तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यासाठी २० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मार्चला रचलेल्या सापळ्यात महानवर याला १५ हजार रुपयांची लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. सुहास हट्टेकर अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
35 हजारांची लाच घेणं भोवलं
पुणे जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तपासात मदत करणे, तसेच जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी एक लाखांची लाच मागणाऱ्या मुळशीतील पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. तडजोडीत तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना सहायक फौजदाराविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४६, रा. ग्रीन फ्लाॅरेन्झा सोसायटी, सूस, ता. मुळशी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.






