संग्रहित फोटो
वाई : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत बसलेल्यांमध्ये मस्करी करत असतानाच झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले असून, या प्रकाराने वाई परिसरात खळबळ माजली आहे.
वाई शहरातील सोनगिरीवाडी येथीलबाभळवनात राज अरुणकुमार सिंग, आणि त्याचे मित्र प्रणित गायकवाड, (वय २५), शाकीरखान (वय २५) असे तिघेजण हे दारू पिण्यासाठी बसले होते. याचवेळी शाकीर राज व प्रणित यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद बघता बघता विकोपाला गेला आणि त्या रागाच्या भरात प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या. शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली. विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राज हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धूम ठोकली. घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनीसिंग याला फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन राज याला रुग्णवाहिकेतून वाईच्या ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी अरुणकुमार सिंग या महिलेने वाई पोलीस ठाण्यात रात्री २ वाजण्याच्या सुमारास दिली. त्या तक्रारीच्या आधारे परिविक्षाधीन डिवायएसपी श्याम पानेगावकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी रात्री २ वाजण्याच्या सुमारास वाईचे डिबी प्रमुख असलेले सुधीर वाळुंज, हवलदार मदन वरखडे, प्रसाद दुदुस्कर,श्रावण राठोड, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, धिरज नेवसे, विशाल येवले, राम कोळी, नितीन कदम,रुपेश जाधव, गौतम दाभाडे या पथकाला बोलावून वाई शहरातुन बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर सापळे लावण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या सुचनेनुसार या पथकाने मांढरदेव घाट, परखंदी घाट अशा ठिकाणचे डोंगररांगा रात्रभर पिंजून काढल्या पण आरोपी काही हाताला लागत नव्हते.
दरम्यान पहाटे घाटात फिरायला येणाऱ्या लोकांना सुधीर वाळुंज यांनी आरोपींचे फोटो दाखवले असता, ते परखंदी घाटाने गेले असल्याचे समजले. अखेर या टिमने डोंगररांगामध्ये लपून बसलेल्या आरोपींना अथक परिश्रम घेवून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना अवघ्या चार तासातच गजाआड केले. वाई तालुक्यातील नागरिकांसह जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी वाईच्या डिबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे. या गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी हे करत आहेत.