राज्याच्या सीमेजवळील भयकंर घटना! (Photo Credit- X)
गोविंदपूर येथील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळत गेला आणि अखेर शुक्रवारी त्याचे रूप थेट रक्तरंजित संघर्षात बदलले. सायंकाळच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोर गावात दाखल झाले आणि त्यांनी थेट अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गावात एकच गोंधळ उडाला. नागरिक जीव वाचवण्यासाठी घरांकडे धावू लागले.
या अमानुष गोळीबारात रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अनेक कुटुंबांचे आधारवड एका क्षणात कोसळल्याने गावात शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेची पथके आणि मोठा पोलीस बंदोबस्त तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. संपूर्ण गाव पोलिसांनी छावणीत रूपांतरित केले असून तणावपूर्ण शांतता कायम आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. सीमाभागात नाकाबंदी करून संशयितांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या रक्तरंजित घटनेमुळे विजयपूर जिल्ह्यासह सोलापूर सीमाभागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जमिनीचा वाद इतका विकोपाला जाऊन सहा जीवांचा बळी जाईल, याची कल्पनाही नव्हती, अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण चडचण तालुका सुन्न झाला असून गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.






