नाशिक: राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्या अडचणी वाढल्या आहेत. फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात त्यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस त्या नाशिक आणि शिर्डी पोलिसांच्या हाती लागल्या नव्हत्या. अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तपासातील गंभीर पुरावे लक्षात घेत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता त्यांची पोलीस कोठडीत चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना खरात यांनी काही व्यक्तींना कोट्यवधी रुपये व्याजाने दिले होते. संबंधित व्यक्तींनी पैसे परत करण्यासाठी आपली जमीन त्यांच्या नावावर करून दिल्याचा आरोप आहे. मात्र, मूळ रक्कम आणि व्याजाची परतफेड करूनही जमीन परत देण्यास नकार देण्यात आल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. तब्बल तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप असून, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हनिमूनला पतीची हत्या; जामीन मिळताच सोनम रघुवंशीने तोडले मौन, म्हणाली, नेपाळला…
‘माझा संबंध नाही’ म्हणत न्यायालयात दावा
या प्रकरणात “मी केवळ अशोक खरात यांची पत्नी असल्याने मला गोवण्यात आले,” असा दावा कल्पना खरात यांनी न्यायालयात केला. मात्र, सरकारी पक्षाने हा युक्तिवाद खोडून काढत फिर्यादीच्या खरेदीखतावर कल्पना खरात यांची सही असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवत संबंधित व्यवहार झाला नसल्याचा भास निर्माण करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले.
पोलीस कोठडीची शक्यता
या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याने आणि तपासासाठी सखोल चौकशी आवश्यक असल्याने आरोपीची पोलीस कोठडी गरजेची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर न्यायालयाने कल्पना खरात यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे आता या प्रकरणातील तपास आणखी वेगाने होण्याची शक्यता आहे.
सासवड येथे वकिलाची केली गेली फसवणूक; भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु करून…
Ans: फसवणूक आणि अवैध सावकारीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
Ans: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
Ans: व्याजाचे पैसे परत करूनही जमीन परत देण्यास नकार दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.






