स्वामी समर्थांच्या भूमिकेत अभिनेता सुनील गोडसेंसमोर काय आहेत आव्हानं
‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका गेले ५ वर्ष कलर्स मराठीवर प्रसारित होत असून ही मालिका अनेक प्रेक्षक पाहतात. आपल्याकडे अनेकजण स्वामी समर्थांचे भक्त आहेत आणि मनापासून ही मालिकादेखील पाहतात. स्वामींचे अनुभव येणारे लोकही अनेक आहेत. ही मालिका करताना नक्की काय आव्हानं आहेत आणि या मालिकेसाठी स्वामींची भूमिका साकारताना नक्की कशी तयारी केली याबाबत अभिनेता सुनील गोडसे यांनी ‘नवराष्ट्र’ सह खास बातचीत केली आहे.
स्वामींची भूमिका साकारताना कोणती आव्हानं आहेत आणि कशी तयारी केली? असे विचारले असताना सुनील गोडसे म्हणाले की, ‘स्वामींची भूमिका करायची ही मालिका सुरू झाली तेव्हापासून माझ्या मनात होतं. ही संधी काही परत आपल्या वाट्याला येणार नाही त्यामुळे जेव्हा मला विचारणार करण्यात आली मी भूमिकेसाठी पटकन होकार दिला आणि मुळात कामाचा अनुभव हा अविस्मरणीय आहे. आव्हानाबाबत सांगायचं झालं तर स्वामींची भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि तेच एक आव्हान आहे. अशा धाटणीची भूमिका करायला माझ्या वाट्याला आली हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आणि ती पुरेपूर साकारण्याचा मी प्रयत्न करत आहे’.
स्वामींच्या भूमिकेसाठी तुम्ही काय तयारी केली होती असं जेव्हा सुनील यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘खरं तर आतापर्यंत १८०० भाग पूर्ण झाले आहेत आणि जेव्हा मी ही भूमिका स्वीकारली तेव्हा सर्वात पहिल्यांदा स्वामींची बखर वाचली, स्वामींचे फोटो संदर्भ घेतले की, स्वामी कसे बसत असतील, कसे बोलत असतील. या बखरीतून स्वामी कळले वा आलेल्या अनुभवातून जे स्वामी कळले त्यानुसार मी तयारी केली. याशिवाय एक जुना चित्रपट होता ज्यामध्ये दिग्गज कलाकार दाजी भाटवडेकरांनी काम केले होते. ही भूमिका साकारण्याआधी त्यांचा चित्रपट पाहिला. त्यातून संदर्भ घेतला. स्टाईल मात्र मी स्वतः जी करता येईल ते अनुभव दाखवायचा प्रयत्न केलाय. स्वामी जसे रागीट होते वा प्रेमळ होते हे दाखवायचा प्रयत्न करतोय आणि ते प्रेक्षकांनाही आवडतंय.’
इतकी मोठी जबाबदारी किती दडपण आहे? म्हटल्यावर ते म्हणाले की, ‘खरं तर स्वामींची भूमिका हे दडपण नाही तर मोठी जबाबदारी आहे आणि ते पेलण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करत आहे. अनेक जण मला प्रसारित झालेले भाग बघून सांगतात की,तुमच्या डोळ्यात बघून आम्हाला संवाद साधता येत नाही, कारण आम्हाला स्वामीच जाणवतात. हीच खरी कामाची पोचपावती आहे. त्यामुळे अजिबात दडपण नाही पण जबाबदारी पेलतोय हे नक्की’
सध्या हरिप्रिया गोष्ट सुरू आहे. कलियुगात विठुरायासोबत लग्न करायची इच्छा आहे कशी स्वामी पूर्ण करणार आहे काय लीला बघायला मिळेल? यावर अगदी मनमोकळेपणाने हसत सुनील गोडसे यांनी उत्तर दिलं की, ‘स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत असतात. कशा पद्धतीने करणार हे पहावं आहे. इच्छा तर स्वामी पूर्ण करणारच पण त्याची पद्धत नक्की कशी असेल हे प्रेक्षकांना नक्की पाहताना नक्की आवडेल.’
Shree Swami Samarth : स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हणतात ? यामगील कथा तुम्हाला माहितेय का ?
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा मिळत आहेत? यावर पटकन उत्तर देताना सुनील गोडसे म्हणाले की, ‘प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप सकारात्मक आहेत. तुम्ही स्वामींंसारखेच दिसता, चालता असंही अनेकांनी सांगितलं. पटकन रिलेट होतात हे छान वाटतं. प्रेक्षकांनी स्वामींच्या भूमिकेत छान स्वीकारलं आहे हे खूप चांगलं वाटतंय. जेव्हा काम सुरु केलं तेव्हा कदाचित प्रेक्षकांना मला स्वीकारायला ५-६ महिने जातील असं वाटलं होतं. पण स्वामींच्या कृपेने हे मला पहिल्याच महिन्यात प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. लोकांनी मला स्वीकारले हीच खूप आनंदाची बाब आहे असं अगदी सहजपणाने म्हणत असंच प्रेम रहावं असंही सांगायला ते विसरले नाहीत.






