फोटो सौजन्य - Social Media
अभिनेते अतुल कुलकर्णी नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर त्यांचे परखड मत मांडताना दिसतात. अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत शासनाला चांगलाच टोला लगावला आहे. त्यांनी एक नाही तर या संदर्भात दोन पोस्ट केले आहेत. एका पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “‘बिनशर्त पाठिंबा’ हा लोकशाही मधला सगळ्यात धोकादायक प्रकार असतो. माझ्या कुठल्यातरी एका ‘अजेंडा’ ला पाठिंबा असणारं, तो राबवणारं सरकार आहे म्हणून त्या सरकारच्या बाकी सगळ्या चुकांना मी पाठीशी घालेन; हा विचार संपूर्ण समाजा बरोबर अंतिमतः स्वतःचा आणि मुख्य म्हणजे पुढच्या पिढ्यांचा घात करणारा असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. सदसदविवेक बुद्धी प्रत्येकाला असतेच. ती गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का हा निर्णय मात्र ज्याचा त्याचा…”
तर पुढील पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “कुठल्याही शासन, प्रशासना मधे, ‘आमचं कधीही काहीही चुकतच नाही’ ही भावना कुठून येत असेल? श्रेष्ठत्वाच्या ह्या खात्रीचं मूळ कशात आहे? आपण नागरिक देखील आपापसात असेच वागू लागलो आहोत काय? तथाकथित ‘नं चुकणाऱ्या’ समूहांचं शिकणं बंद होत आणि ऱ्हास अटळ असतो.”
या दोन्ही पोस्टमुळे अतुल कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अतुल कुलकरणींसह धनश्री काडगावकरने ही या पावसात घडलेल्या दुर्घटनेबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट करत ती 9 तासांसाठी मुंबई-पुणे महामार्गावर अडकलेली असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली. तसेच सांगितले की मासिक पाळी असताना साधं वॉशरूमला जाणंही यात शक्य नव्हतं.






