फोटो सौजन्य - Social Media
भविष्यातील कारकिर्दीबाबत बोलताना भूमीने स्वतःला अजूनही “एक छोटी आणि भुकेली कलाकार” असल्याचे सांगितले. अजून खूप काही शिकायचे आणि मोठे काम करायचे आहे, असे नमूद करत तिने ‘मदर इंडिया २’सारख्या भव्य चित्रपटाचा भाग बनण्याची इच्छा व्यक्त केली. समाजात वाढत असलेल्या महिला अत्याचार, शोषण आणि गंभीर गुन्ह्यांबाबतही भूमीने चिंता व्यक्त केली. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा, आवश्यक असल्यास मृत्युदंडाची तरतूद असावी, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल, असे ती म्हणाली. यासोबतच सोशल मीडियावरील आशयावर प्रभावी नियंत्रण आणि कठोर नियमांची आवश्यकता असल्याचेही तिने सांगितले. मुलांवर चुकीचा परिणाम होऊ नये यासाठी सरकार, पालक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे तिने नमूद केले.
डिजिटल युगातील ट्रोलिंग आणि ऑनलाइन बुलिंग हा सध्या मोठा सामाजिक प्रश्न बनत असल्याचेही भूमीने सांगितले. इंटरनेटवरील ट्रोलिंगला तिने थेट छळ (Harassment) असे संबोधले. विशेषतः लहान मुले आणि तरुणांवर याचा गंभीर मानसिक परिणाम होत असल्याने त्यांच्यासाठी सक्षम यंत्रणा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचे ती म्हणाली. शालेय जीवनात तसेच नंतर स्वतःलाही ऑनलाइन बुलिंगचा सामना करावा लागल्याचा अनुभव तिने यावेळी शेअर केला. युवकांना संदेश देताना भूमी म्हणाली की, ट्रोल करणारे अनेकदा स्वतःच असुरक्षित आणि भीतीग्रस्त असतात. त्यामुळे त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे खचून न जाता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे.
मानसिक आरोग्याच्या विषयावर बोलताना भूमीने सहानुभूती (Empathy) आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता (Vulnerability) हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगितले. पालकांनी मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि एखादे मूल ‘मी त्रस्त आहे’ असे सांगत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन तिने केले. स्वतःच्या आयुष्यात आई-वडिलांनी कायम पाठिंबा दिला आणि स्वप्नांवर विश्वास ठेवला, त्यामुळेच आपला आत्मविश्वास टिकून राहिल्याचे भूमीने सांगितले. ‘नवभारत कॉन्क्लेव्ह २०२६’मधील भूमी पेडणेकरच्या भाषणात विकसित भारताची संकल्पना, सामाजिक जबाबदारी, मानसिक आरोग्य, सुरक्षित समाज आणि जबाबदार मनोरंजन यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. तिच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






