( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
झी मराठीवरील लोकप्रिय ‘दीपज्योती’ आणि ‘शुभ श्रावणी’ या मालिका सध्या रंजक वळणावर आल्या असून, आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना भावनिक, नाट्यमय आणि उत्कंठावर्धक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. विश्वास, प्रेम, त्याग आणि कुटुंबातील नात्यांची सुंदर गुंफण या दोन्ही मालिकांमध्ये अधिक प्रभावीपणे उलगडताना दिसणार आहे.
‘दीपज्योती’ मालिकेत सुभद्रा मुद्दाम पाचपरतावणीच्या जेवणात बिघाड करून घरात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दीप आणि ज्योती एकत्र येऊन नव्याने स्वयंपाक करतात. या निमित्ताने दोघांमधील नोकझोक, संवाद आणि वाढत जाणारी जवळीक कथेला नवे वळण देणार आहे.
स्वराज आणि प्रीतीचा संसार सुखाचा राहावा यासाठी दीप आणि ज्योती एकत्र काम करण्याचा निर्णय घेतात. मात्र, सुभद्रा स्वराजने प्रीतीला दिलेली भेटवस्तू खराब करून पुन्हा एकदा घरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते. कुटुंबात वाद होऊ नये म्हणून ज्योती हा दोष स्वतःवर घेते. तिच्या या त्यागामुळे घरातील शांतता टिकून राहते. त्याचवेळी पुरुषोत्तम यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त ज्योती खास सरप्राईज सेलिब्रेशनचे आयोजन करताना दिसणार आहे.
दुसरीकडे, ‘शुभ श्रावणी’ मालिकेत श्रावणीला घरात सातत्याने अपमान आणि अवहेलनेचा सामना करावा लागत असला, तरी शुभू तिची खंबीर साथ सोडत नाही. मात्र, विश्वंभरचा वाढता राग आणि शुभूची नोकरी जाणे या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात नवे संकट उभे राहते. याच परिस्थितीचा फायदा घेत काही जण शुभू आणि श्रावणी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
दरम्यान, सानिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होत असतानाच तिच्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्यामुळे शुभू आणि श्रावणी या नव्या आव्हानांना कसे सामोरे जातील? त्यांच्या नात्याची परीक्षा या संकटातून कशी होईल? आणि कुटुंबातील कटकारस्थानांवर ते मात करू शकतील का? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
आगामी भागांमधील या अनपेक्षित घडामोडींमुळे ‘दीपज्योती’ आणि ‘शुभ श्रावणी’ या दोन्ही मालिका अधिक रंगतदार होणार असून प्रेक्षकांना भावनिक आणि मनोरंजक अनुभव देणार आहेत.






