RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा
विधानसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
सरनाईक यांनी सांगितले की, आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये आणि तपास निष्पक्षपणे पार पडावा, यासाठी खालील अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार
मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे
मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने
या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी सुनिश्चित करण्यासाठी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी सभागृहात दिली. चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “परिवहन विभागात भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही. चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये आणि सत्य बाहेर यावे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दया न दाखवता कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.”
राज्याच्या परिवहन व्यवस्थेत पारदर्शकता, जबाबदारी आणि जनतेचा विश्वास कायम ठेवणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराविरोधातील ही मोहीम केवळ या प्रकरणापुरती मर्यादित राहणार नसून, भविष्यातही अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारच्या या निर्णयामुळे आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांच्या तपासाला वेग मिळण्याची शक्यता असून, चौकशीच्या निष्कर्षानंतर दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…






