तेजस्वीच्या बालिश स्वभावामुळे करण कुंद्रा वैतागला? ‘देसी ब्लिंग’मध्ये केला नात्यावर खुलासा
तेजस्वी आणि करण ‘बिग बॉस‘च्या दिवसांपासून एकत्र आहेत आणि त्यांचे नाते अधिकृत व्हावे यासाठी चाहते उत्सुक होते. अलीकडेच, या जोडप्याने सर्वांसमोर एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. शेवटच्या एपिसोडमध्ये, चाहत्यांची इच्छा पूर्ण करत करणने तेजस्वीला प्रपोज केला. अलीकडेच, करणने सांगितले की त्यांच्या नात्यात पुढे जाणे त्याच्यासाठी किती कठीण होते. त्याने तेजस्वीला हा प्रश्न आधी का विचारला नाही, याचे स्पष्टीकरण करणने दिले.
शोच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये करणला विचारण्यात आलं की, त्याने आतापर्यंत तेजस्वीला प्रपोज का केलं नव्हतं? या प्रश्नाला उत्तर देताना ‘कितनी मोहब्बत है’ फेम अभिनेत्याने मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.
करण म्हणाला की, कुठेतरी त्याला तेजस्वीसोबत एका पालकासारखं वागावं लागत होतं आणि त्यामुळे तो संभ्रमात होता की तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य कसं व्यतीत करणार? करण म्हणाला, “जेव्हा नवरा-बायकोच्या नात्याचा प्रश्न येतो, तेव्हा दोघांनाही आपापली भूमिका निभवावी लागते. मला वाटतं की ती (तेजस्वी) थोडी अधिक समजूतदार व्हावी. तिने थोडं कमी डिमांडिंग असायला हवं. मी तुमच्यासाठी सगळंच करू शकत नाही.”
करणने पुढे सांगितले, “असा विचार कर! तुझं विमान दुपारी ४ वाजता उतरणार आहे, मग तुला घ्यायला कोणाला पाठवायचं हे ठरवण्याची जबाबदारी तू माझ्यावर कशी सोपवू शकतेस? मी विसरलो तर काय होईल? मला तिच्यासोबत एका पालकासारखं वागावं लागतं.”
करण पुढे म्हणाला, “दोन-तीन वर्षांपूर्वी माझे आई-वडील म्हणाले होते, ‘करण, तू कायम तिच्यासोबत असतोस आणि सगळं तूच सांभाळतोस. भविष्यात तुम्हाला मुलं झाली, तर परिस्थिती अशीच राहिली तर?’ त्यांना याची काळजी वाटत होती.”
करण आणि तेजस्वी यांची पहिली भेट ‘बिग बॉस १५’च्या सेटवर झाली होती. दोघेही एकत्र घरात राहत असताना त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीने चाहत्यांची मनं जिंकली असून आजही ही जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ‘देसी ब्लिंग’मध्ये दोघे एकत्र झळकत असल्याने त्यांच्या चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. या शोमधील त्यांची केमिस्ट्री आणि ऑफस्क्रीन बॉन्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.






