अश्विनी कासार आणि ओमकार गोवर्धन चित्रपटात झळकणार
बोधी सिनेमा या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर करणार असून संगीत आणि पार्श्वसंगीत समाधान ऐवळे हे करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वाघ्या मुरळी परंपरेवर आधारित असलेल्या “फुला” चित्रपटातून अभिषेक जावीर आणि समाधान ऐवळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले होते. “फुला” चित्रपटाच्या यशानंतर अभिषेक आणि समाधान हे पुन्हा एकदा जोमाने या चित्रपटाच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत.
काय आहे कथा?
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माणदेशात घडलेल्या सत्य कथेवरती आधारित हा चित्रपट आहे. कुकुडवाड मायणी या भागामध्ये प्रसिद्ध असणारे दोन नरवीर बाज्या आणि बैजा यांच्या जीवनावरती हा चित्रपट आहे. तिच्या समोर हे दोन्ही नरवीर गोफण नेमबाजी करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गोरगरीब आणि शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय या विरोधात बंड केले होते. सशस्त्र इंग्रजा विरुद्ध त्यांनी आपल्या माणदेशी दुर्गम भागाचा वापर करून लढा उभारला होता. बंदूकधारी इंग्रज सैनिकांचे या दोन्ही नरवीरांनी आपल्या गोफनीने कित्येक वेळा डोके फोडले होते. गाव गावगाड्यातील जुलमी सावकार यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. अशा थरारक आणि साहसी ऐतिहासिक घटनेवरती या चित्रपटाची कथा आधारलेली असल्याचे दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितले.
पुन्हा एकत्र
अभिनेता ओमकार गोवर्धन सोबत आजवर मालिकांमधून झळकणारी अभिनेत्री अश्विनी कासार हिची देखील मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. “फुला” चित्रपटातील अभिनेत्री मंजुशी खेत्री, आरोही गडदे, सनी कदम, सृष्टी जाधव, उमेश बोलके यांचाही अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गीतांसाठी वेगळा बाज वापरणार असल्याचे संगीतकार समाधान ऐवळे यांनी सांगितले. चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच सुरु होणार आहे.
या दोन्ही कलाकारांची जोडगोळी सध्या एका नाटकात काम करत असून दोघांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ओमकार आणि अश्विनी दोघेही मालिकांमधूनही काम करत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. या चित्रपटाची नक्कीच प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतील.






