( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला आहे. १४ जून रोजी पालघरच्या नालासोपारा येथील तिच्या घरी ति मृतावस्थेत आढळली. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संचिता ‘कुमकुम भाग्य’, ‘वागळे की दुनिया’ आणि ‘दिलवाली दुल्हा ले जाएंगे’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली होती. सध्या तिच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे मानले जात आहे, परंतु कुटुंब, मित्र आणि सहकलाकारांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे हे प्रकरण वादात सापडले आहे. दरम्यान, तिचे व्हॉट्सॲप चॅट्सही समोर आले आहेत.
संचिता उगले हिचे वयाच्या २२ व्या वर्षी निधन झाले. ती नैराश्याने ग्रस्त होती आणि एका डॉक्टरकडून तिच्यावर उपचार सुरू होते. कुटुंबीय आणि मित्रांनी संचितावर इंडस्ट्रीतील दबावाचा आरोप केला आहे. अनेकांच्या मते, तिला काम मिळत नव्हते. दरम्यान, तिचे व्हॉट्सॲप चॅट्सही समोर आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संचिताने तिच्या घरातील एका बंद खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी संचिता उगलेच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू अहवाल (ADR) म्हणून केली असून, तपास अधिकारी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासह सर्व बाबींची चौकशी करत आहेत. संचिताच्या मृत्यूच्या कारणाबद्दल कुटुंबीयांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या वडिलांचा आरोप आहे की, मृत्यू होण्यापूर्वी संचिता मानसिक तणावाखाली होती आणि तिचा छळ होत होता. ते म्हणाले, “इंडस्ट्रीमधील लोक तिच्यावर दबाव टाकत होते. ती घरी खूप अस्वस्थ होती. ती वरवर ठीक दिसत होती, पण आतून तिला घुसमटत होते. इंडस्ट्रीतील सदस्यांच्या दबावामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली.”
संचिता उगले आणि तिच्या मानसशास्त्रज्ञ यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्सदेखील समोर आले आहेत. या चॅट्समधून असे दिसून येते की, संचिता तिच्या भविष्याबद्दल चिंतित आणि भयभीत होती. इतकेच नाही, तर शूटिंगदरम्यान तिला तिचे डायलॉग्स लक्षात ठेवण्यात अडचण येत होती.
चॅटमधून असे दिसून येते की, संचिता उगलेने आपले डायलॉग विसरण्याबद्दल एका साइकोलॉजिस्ट संवाद साधला होता. संचिता इतकी तणावाखाली होती की, तिला पूर्वीसारखा अभिनय करता येत नाही असे वाटत होते. तिने डॉक्टरांना असेही सांगितले की, अनेक महिने उपचार घेऊनही तिला काहीच बरे वाटत नव्हते. डॉक्टरांनी तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला.
संचिताची जवळची मैत्रीण, इंद्रक्षी कांजिलाल हिनेही आरोप केला की, संचिताला सेटवर समस्या येत होत्या. तिने संचिताचा सह-अभिनेता, उज्ज्वल शर्मा याच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आणि दावा केला की, त्या दोघांमध्ये पैसे आणि कामाशी संबंधित मुद्द्यांवरून मतभेद होते..






