इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढणार; 'या' पक्षाकडून प्रवेशासाठी जोरदार हालचाली?
नवी दिल्ली : इंडिया आघाडीकडून पुढील राजकीय भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहे. त्यातच सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ६ जूनला एक महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत प्रादेशिक पक्षांची कमकुवत होत असलेली स्थिती आणि मतदार यादीतील अनियमितता यांसारख्या गंभीर मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील नुकत्याच झालेल्या पराभवांच्या आणि भाजपच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आक्रमक आहेत. त्यांचा तृणमूल पक्ष आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेते आता आपले मतभेद बाजूला ठेवून ‘लोकशाही वाचवण्यासाठी’ एकत्र येण्याची तयारी करत आहेत. विरोधी पक्षांमध्ये अशी चिंता वाढत आहे की, त्यांच्यातील समन्वय आणि एकतेच्या अभावामुळे सत्ताधारी भाजपला थेट फायदा होत असून, त्यांची राजकीय पकड अधिक मजबूत होत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी विरोधी पक्षांची भूमिका अधिकच कठोर केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुका घेण्याच्या पद्धतींबाबत आता अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यांनी विशेषतः पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालांचा उल्लेख करत, भाजपने तेथील जनादेश ‘चोरला’ असल्याचा आरोप केला.
पक्षाची स्थिती मजबूत करण्याची गरज
या निवडणुकीतील अनुभवांच्या आणि बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षांचे नेते आता आपली स्थिती नव्याने मजबूत करण्याची तयारी करत आहेत. असे मानले जाते की, या बैठकीत विरोधी पक्ष देशाच्या मतदार यादीतील कथित अनियमितता आणि पारदर्शकतेच्या मुद्यावर एक समान रणनीती तयार करतील.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय
बंगालच्या निवडणुकीत भाजपने राज्यात टीएमसीला सत्तेवरून पायउतार केले. तेव्हापासून ममता बॅनर्जी विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, जूनच्या पहिल्या आठवड्यात अखिल भारतीय आघाडीची बैठक बोलवावी आणि त्यात अधिक समविचारी पक्षांना आमंत्रित करावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यानुसार, आता ही बैठक होणार आहे.






