आम आदमी पक्षावर ऑपरेशन लॉटस झाले असून सात खासदार हे भाजपमध्ये सामील होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Operation Lotus on AAP : नवी दिल्ली : देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी मोठी घटना समोर आली आहे. राजकारणाच्या पलटावर भाजपने मोठी खेळी खेळली आहे. ऑपरेशन लोटस करुन आम आदमी पक्षाच्या खासदारांना फोडण्यात भाजपला यश आले आहे. यामध्ये आपचे महत्त्वाचे आणि अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासातील नेत्यांचा समावेश आहे. खासदार राघव चड्ढांनी (Raghav Chadha) पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे. आम आदमी पक्षातील दोन तृतीयांश लोक हे भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षातील ही फूट अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानली जात आहे. पक्ष सोडलेले बहुतेक नेते पंजाबचे असून त्यांनी पक्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र त्यांच्या पक्षांतराच्या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये राघव चड्ढा यांच्या ऐवजी राज्यसभेचे उपनेते झालेल्या अशोक मित्तल यांचा देखील समावेश आहे.
हे देखील वाचा : ‘मी चुकीच्या पक्षातला योग्य माणूस…’ राघव चड्ढांसह ३ खासदारांचा ‘आप’चा राजीनामा
आप’मधील फुटीची घोषणा करताना राघव चड्ढा पत्रकार परिषदेत म्हणाले, “राज्यसभेत आम आदमी पक्षाचे १० खासदार आहेत. या मोहिमेत दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदार आमच्यासोबत आहेत. त्यांनी सह्या केल्या आहेत. आम्ही राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र सादर केले आहे.” संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या चड्ढा यांनी सांगितले की, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल हे देखील भाजपमध्ये सामील होत आहेत. या सात जणांव्यतिरिक्त आपण त्यांच्याही संपर्कात असल्याचे सांगून राघव चड्ढा यांनी केजरीवाल यांची चिंता वाढवण्याचा प्रयत्न केला.
तीन नेत्यांचा आधीच आला होता संशय
आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सात खासदारांपैकी तिघे असे पाऊल उचलतील अशी आधीच अपेक्षा होती. यामध्ये राघव चड्ढा आणि ‘आप’ यांच्यातील मतभेदांची बातमी सार्वजनिक झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा त्यांना उपनेतेपदावरून हटवण्यात आले, तेव्हा चड्ढा कोणत्याही क्षणी केजरीवाल यांना सोडून जातील असा अंदाज वर्तवला जात होता. हरभजन सिंग हेदेखील पक्षाच्या हालचालींवर बराच काळ गप्प राहिले होते. स्वाती मालीवाल यांच्या बंडाची संपूर्ण कहाणी सर्वांनाच माहीत आहे.
हे देखील वाचा : बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा ‘गड’ जिंकण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान; काय आहे राजकीय समीकरणे?
संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी दिला आश्चर्याचा धक्का
आपमधील या मोठ्या फुटीतील दोन नावांनी स्वतः अरविंद केजरीवाल यांनाही आश्चर्य वाटले असेल. अशोक मित्तल ही तीच व्यक्ती आहे, ज्यांना पक्षाने राघव चड्ढा यांच्या जागी उपनेते म्हणून नियुक्त केले होते. दुसरीकडे, संदीप पाठक यांना अलीकडेच अरविंद केजरीवाल यांचे सर्वात विश्वासू रणनीतिकार म्हणून संबोधले जात होते, जे पक्षाच्या विस्तार योजनांवर काम करत होते. त्यामुळे या दोन नेत्यांचे भाजपमध्ये जाणे हे अत्यंत अनपेक्षित असे आणि धक्कादायक होते.






