2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडिया’आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) च्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष राज्यात एकट्याने निवडणूक लढवणार आहे. बुधवारी (२४ जानेवारी २०२४) ही मोठी घोषणा करून त्यांनी काँग्रेस आणि डाव्यांवर आपला राग काढला. ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले त्यामुळे त्यांनी एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दीदींच्या म्हणण्यानुसार, टीएमसी बंगालमध्ये कोणाशीही समन्वय साधणार नाही. बंगालमधील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत त्यांच्या पक्षाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच काँग्रेसने त्यांच्याशी याबाबत काहीही चर्चा केली नाही. सीएम ममतांनी जे काही प्रस्ताव दिले ते फेटाळले गेले. तृणमूल सुप्रिमो बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसचा पश्चिम बंगालशी काहीही संबंध नाही. त्यांचा हा प्रस्ताव पहिल्याच दिवशी फेटाळण्यात आला.
TMC स्वबळावर भाजपचा पराभव करेल – ममता बॅनर्जींचा दावा
ममता बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, “माझी काँग्रेसशी कोणतीही चर्चा झाली नाही. मी नेहमीच म्हटले आहे की बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये तेच असेल. भाजपचा एकहाती पराभव करण्याची आमची तयारी आहे. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही.
काँग्रेस म्हणाली- न्याय यात्रेचा उद्देश वेगळा
ममता बॅनर्जींच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, ममता बॅनर्जींशिवाय आघाडीची कल्पनाही करू शकत नाही. ममता बॅनर्जींच्या निर्णयावर कन्हैया कुमार म्हणाला, या देशात निवडणुका होतच राहतील. निवडणुकीचा आमच्या यात्रेशी काहीही संबंध नाही. इंडिया आघाडीमध्ये जागावाटप सुरू असून त्याचा आणि न्याय यात्रेचा संबंध येत नाही. न्याय यात्रेचा उद्देश वेगळा आहे.
बंगालमध्ये काँग्रेसची न्याय यात्रा कधी आणि कुठे दाखल होत आहे?
ईशान्येतील मणिपूर येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये 5 दिवसांत एकूण 523 किलोमीटरचे अंतर कापत 7 जिल्ह्यांचा समावेश करेल. गुरुवारी (२५ जानेवारी २०२४) ते कूचबिहारहून बंगालमध्ये प्रवेश करेल. मात्र, ही यात्रा राज्याची राजधानी कोलकाता येथे जाणार नसल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने माध्यमांना सांगितले होते.
जागावाटपावरून ममता बॅनर्जी एक दिवसापूर्वी काँग्रेसवर नाराज होत्या.
याच्या एक दिवस आधी, मंगळवारी (23 जानेवारी 2024) ममता बॅनर्जी यांनी 10-12 लोकसभा मतदारसंघांच्या ‘अवास्तव’ मागणीचा हवाला देत बंगालमधील जागावाटपाच्या चर्चेला उशीर केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली होती. तृणमूल काँग्रेसने राज्यात काँग्रेसला फक्त दोन जागा देऊ केल्या होत्या. तृणमूलचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीरभूम जिल्ह्यात झालेल्या संघटनात्मक बैठकीत सीएम बॅनर्जी यांनी ही माहिती दिली.






