Bihar Election Election Result: बिहारमधील मतचोरीचे दोन आठवड्यांत पुरावे देणार; राहुल गांधींचे खुले
Rahul Gandhi on Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने थेट मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. पक्षाकडून निवडणुकीतील हेराफेरीचे पुरावे गोळा केले जात असून ते दोन आठवड्यांत देशासमोर सादर केले जातील,असे खुले आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, कोषाध्यक्ष अजय माकन आणि राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा उपस्थित होते. बिहारमधील पराभवाची कारणे, मतमोजणीतील अनियमितता आणि भविष्यातील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.
Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
वेणुगोपाल आणि अजय माकन यांनी बिहार निवडणूक निकालांबाबत निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, मतमोजणीच्या अनेक टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे पक्षाला वाटते. बिहार निवडणुकीत मतचोरी झाल्यामुळेच पक्षाचा पराभव झाला. काँग्रेस आता संपूर्ण मतदानाच्या आकडेवारीचा तपशीलवार आणि सखोल आढावा घेणार असून, अहवाल तयार झाल्यानंतर निवडणुकीतील कथित मतचोरीची माहिती देशासमोर मांडली जाईल. एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस रस्त्यांपासून संसदेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आल्याचेही के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने बिहारमध्ये ६१ जागांवर उमेदवार उभे कैले होते, परंतु त्याना फक्त सहा जागांवर विजय मिळाला, पक्षाच्या मतांचा वाटा ८.७१% पर्यंत घसरला, जो २०२० मध्ये ७० जागा लढवताना ९.६% होता. सुरेंद्र प्रसाद (वाल्मिकी नगर), अभिषेक रंजन (चनपटिया), मनोज विस्वास (फोर्ब्सगंज), अबिदुर रहमान (अररिया), मोहम्मद कमरूल होडा (किशनगंज) आणि मनोहर प्रसाद सिंग (मनिहारी) है सहा उमेदवार विजयी झाले.
सूत्रांनुसार, राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि बुथ व्यवस्थापनातील त्रुटींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पैशाच्या बदल्यात तिकीट वाटपाच्या आरोपांची गंभीरता तपासण्यास सांगितले. राहुल यांनी त्यांच्या सल्लागार गटाने संपूर्ण निवडणुकीत अंधारात ठेवले, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार निवडण्यासाठी विश्वासू नेत्यांची समिती स्थापन करूनही योग्य उमेदवार का निवडले गेले नाहीत ? तिकीट विक्रीचे आरोप का केले जात आहेत? असे सवाल उपस्थित करत सत्य समोर आणले पाहिजे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याला सोडले जाणार नाही. पक्षाने स्वतःच्या पातळीवर या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच ते वैयक्तिकरित्याही याची चौकशी करतील, असेही ते म्हणाले. राहुल यांनी खर्गे यांना पक्षातील गद्दारांना ओळखून त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.






