सीजेपीच्या तीनही मागण्या मान्य; जंतर-मंतरवरील आंदोलन अखेर मागे घेण्याची घोषणा
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांनी तात्काळ शांततेच्या मार्गाने आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी परतावे, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यातील रणनीतीबाबत आणि इतर मुद्द्यांबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही आंदोलनकर्त्यांना घरी परतण्याचे आवाहन केले. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आणि ठरलेल्या कालमर्यादेत अटींची अंमलबजावणी होईल, या अपेक्षेने आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी NEET परीक्षेशी संबंधित आत्महत्यांमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना नियमांनुसार आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती दिली. CJP ने या कुटुंबांना १ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यावर सरकारने कायदेशीर तरतुदींनुसार सन्मानजनक आर्थिक भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचे आशुतोष रांका यांनी सांगितले.
याशिवाय, CJP ने शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा करण्यासाठी सरकारसमोर पाच सूत्री मागण्यांचे निवेदनही सादर केले आहे. या मागण्यांवर पुढील चार आठवड्यांत पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले.
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनादरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही सीजेपीचे आंदोलन मागे घेण्यात आले. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांसंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही मुद्द्यांवर तत्त्वतः सहमती झाली असून, त्यावर लेखी उत्तर मिळण्याची त्यांना आशा आहे. ४७ एनटीए अधिकाऱ्यांना हटवण्याच्या सरकारच्या निर्णयावरही रांका यांनी प्रतिक्रिया दिली.






