CJP Protest News: जंतर-मंतरवरील राड्यानंतर दिल्लीत कडक निर्बंध; अभिजीत दिपकेंचा थेट हल्ला
CJP Protest News: जंतरमंतरवर रात्रीच्या सुमारास दिल्ली पोलिस आणि विद्यार्थ्यांध्ये चकमक झाली. या चकमकीत विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठा संघर्ष सुरू होता. याघटनेनंतरदिल्ली मेट्रो प्रशासनाकडून आज (२३ जुलै) १६ स्थानके बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदी संपूर्ण दिल्ली बंद करायला तयार आहेत, पण धर्मेंद्र प्रधान यांना हटवायला नाही.” असं म्हणत अभिजीत यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.
डीएमआरसीने सकाळी ७:३० वाजल्यापासून राजीव चौक, सुप्रीम कोर्ट, मंडी हाऊस आणि आयटीओ यासह १६ रेल्वे स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली मेट्रोच्या एका पोस्टनुसार, लोक कल्याण मार्ग, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सेवा तीर्थ, जनपथ, सेंट्रल सेक्रेटरीएट, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) आंदोलनादरम्यान वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशनवर प्रवाशांसाठी ट्रेन बदलण्याची सोय उपलब्ध असेल.
दिल्ली मेट्रोनुसार, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके सकाळी ७:३० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवर प्रवाशांसाठी केवळ इंटरचेंज सुविधा उपलब्ध असेल. या स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार नाही.
यापूर्वी, काल रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलकांची संख्या ३,००० ते ४,००० पर्यंत वाढली होती आणि रात्री उशिरापर्यंत ती वाढतच राहिली. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तेथे मोठ्या संख्येने “समाजकंटक” जमले होते. यापैकी काही आंदोलकांनी आधी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर, हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
या संघर्षात दोन एसीपी, दोन इन्स्पेक्टर आणि एका कॉन्स्टेबलसह पाच पोलीस जखमी झाले. अनेक आंदोलकही जखमी झाले. नवी दिल्लीतील जंतर मंतर, टॉल्स्टॉय मार्ग आणि पार्लमेंट मार्गावरील एनडीएमसी इमारतीसमोर जमाव जमला होता. सूत्रांनुसार, परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांनी सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याशी चर्चा केली, परंतु जमावाने त्यांचेही ऐकले नाही.
आंदोलकांनी रात्रभर एका रेड लाईट स्टेशनवर गोंधळ घातला आणि पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचे अधिकारी रात्रभर बॅरिकेड्सवर तैनात असलेले दिसले. मात्र, काही आंदोलकांनी आपले चेहरे झाकले होते. अनेकांनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला; काहींनी स्पायडर-मॅनचे मुखवटे घातले होते, तर काहींनी हातावर रुमाल बांधले होते.
आज जंतर मंतरवरील आंदोलनाचा ३४ वा दिवस आहे. मात्र, गेल्या चार रात्रींपासून आंदोलनाची तीव्रता वाढली असून, जंतर मंतरवरील गर्दी सातत्याने वाढत आहे. सकाळीसुद्धा सीजेपीचे हजारो समर्थक उपस्थित होते.






