Photo : Arvind Kejriwal
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. ‘निवडणुकीच्या पाच टप्प्यांनंतर आता हे स्पष्ट झाले आहे की, 4 जून रोजी भाजपचे सरकार जाणार आणि ‘इंडिया’ आघाडीचे (INDIA Alliance) सरकार येणार आहे’, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता आणखी दोन टप्प्यांत मतदान होणे बाकी आहे. असे असताना आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे सरकत आहेत, तसे हे स्पष्ट होत आहे की भाजपचे सरकार जाणार आणि ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार आहे. अमित शहा दिल्लीत आले होते. संगम विहारमध्ये 500 पेक्षाही कमी लोकांच्या जाहीरसभेत त्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांनी ‘आप’च्या समर्थकांना पाकिस्तानी म्हटले. हे चुकीचे आहे’.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘योगीजीही दिल्लीत आले होते. तेही माझ्याबद्दल खूप वाईट बोलले. मला वाईट बोलण्याऐवजी त्यांनी आपले पक्षातील स्थान पक्के करावे. यूपीच्या सत्तेतून खाली खेचण्याची मोदीजी आणि अमित शहा यांनी पूर्ण योजना आखल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले.






