देशात यंदा कडक उन्हाळा असणार (फोटो- istockphoto)
यंदा देशात असणार कडक उन्हाळा
किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज
उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची शक्यता
सुनयना सोनवणे/पुणे: भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या कालावधीसाठीचा हंगामी तापमान आणि पावसाचा अंदाज नुकताच जाहीर केला. यंदा देशातील उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत देशातील बहुतांश भागांत कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार संपूर्ण उन्हाळी हंगामात देशातील बहुतेक भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. मात्र दक्षिण भारतातील काही भाग आणि काही इतर ठिकाणी किमान तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मार्च २०२६ महिन्याचा विचार करता देशातील अनेक भागांत कमाल तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारत, पूर्व भारतातील काही भाग, पश्चिम हिमालयीन प्रदेश तसेच मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात देशातील बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. तर उत्तर-पश्चिम भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भागांत किमान तापमान सामान्य ते कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उष्णतेच्या लाटांबाबतही हवामान विभागाने इशारा दिला आहे. मार्च ते मे या कालावधीत पूर्व आणि पूर्व-मध्य भारत, आग्नेय द्वीपकल्प तसेच उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य भारतातील काही भागांत उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा अधिक राहू शकतात. मार्च महिन्यात गुजरात आणि आंध्र प्रदेशातील काही भागांत उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता आहे.
पावसाच्या बाबतीत मार्च महिन्यात देशातील सरासरी पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार मार्चमध्ये देशात सुमारे २९.९ मिमी पाऊस पडतो. यंदा अनेक भागांत सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असला तरी ईशान्य भारत तसेच उत्तर-पश्चिम आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागांत पाऊस कमी पडू शकतो.
सध्या प्रशांत महासागरात कमकुवत ‘ला नीना’ परिस्थिती असून ती पुढील काही महिन्यांत कमी होण्याची शक्यता आहे. तसेच हिंदी महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ सध्या तटस्थ अवस्थेत असून पुढील काळातही हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य, पाणीपुरवठा आणि वीज वापरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या तीव्र उन्हापासून बचाव करणे, पुरेसे पाणी पिणे तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हवामान अंदाजाची आधुनिक प्रणाली
२०१६ पासून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला भारतीय हवामान विभाग देशासाठी हिवाळा व उन्हाळा या दोन्ही हंगामांसाठी हंगामी तापमानाचा अंदाज जाहीर करत आहे. सध्या हा अंदाज मल्टी-मॉडेल एन्सेंबल पद्धतीवर आधारित असून त्यात ‘मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम’ या भारतीय मॉडेलचाही समावेश आहे. याच प्रणालीच्या मदतीने मार्च ते मे २०२६ या उन्हाळी हंगामाचा अंदाज तयार करण्यात आला आहे.






