LPG Supply Shortage: गॅस टंचाईमुळे मोबाईल नेटवर्क गायब होणार? ५ मार्चपासून टॉवर कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद
इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम केवळ स्वयंपाकघरातील गॅसपर्यंत मर्यादित न राहता, आता दूरसंचार (Telecom) क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवरही होऊ लागला आहे. एलपीजी आणि एलएनजी (LNG) पुरवठ्यात होणाऱ्या व्यत्ययामुळे टेलिकॉम टॉवरच्या उत्पादनावर आणि नवीन टॉवर बसवण्याच्या योजनांवर नकारात्मक परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
देशातील एलपीजी पुरवठ्यातील तुटवड्याचा मोबाईल आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होऊ शकतो. असे टेलिकॉम टॉवर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांकडून सांगितले जात आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशन (डीआयपीए), डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उद्योग संघटनांनी दिलेल्या माहितीनुसारस, सरकारी आदेशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी टेलिकॉम टॉवर उत्पादक कंपन्यांना एलपीजी पुरवठा थांबवला आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती आणि इंधन संकटामुळे मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना सध्या फक्त घरगुती ग्राहकांना एलपीजी पुरवठा करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
टेलिकॉम टॉवर उत्पादन प्रक्रियेत गॅल्वनायझेशनचा समावेश आहे, ज्यासाठी एलपीजी किंवा गॅस-आधारित इंधन आवश्यक आहे. यामुळे, टेलिकॉम टॉवर उत्पादक कंपन्यांना एलपीजीचा सतत पुरवठा आवश्यक आहे आणि आता हे थांबले आहे, टॉवर उत्पादन युनिट्सना अडचणी येत आहेत. ही परिस्थिती दीर्घकाळ चालू राहिल्यास, टॉवर उत्पादन विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होऊ शकतो.
संघटनेने (DIPA) या प्रकरणात दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांच्याकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, तेल विपणन कंपन्यांकडून टेलिकॉम टॉवर उत्पादक कंपन्यांना एलपीजीचा पुरवठा ५ मार्च २०२६ पासून बंद करण्यात आला आहे. यामुळे टॉवर उत्पादक युनिट्ससाठी गंभीर ऑपरेशनल समस्या निर्माण झाल्या आहेत. DIPA ने इशारा दिला की जर ही परिस्थिती दीर्घकाळ चालू राहिली तर प्लांट्सना उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागू शकते. असे प्लांट्स पुन्हा सुरू करण्यास बराच वेळ लागतो, ज्यामुळे टॉवर उत्पादनावर बराच काळ परिणाम होऊ शकतो.
‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशन’च्या (DIPA) सदस्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कंपन्यांचा समावेश आहे:
इंडस टॉवर्स (Indus Towers)
व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea)
असेंड टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर (Ascend Telecom Infrastructure)
झेंट्री इंडिया (Gentry India)
एलपीजीचा वापर टॉवर उत्पादनातील महत्त्वाच्या प्रक्रिया व इंधनासाठी केला जातो. पुरवठा विस्कळीत झाल्यास, नवीन मोबाईल टॉवर्स तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतील. दुर्गम किंवा कमी नेटवर्क क्षमता असलेल्या भागात नवीन टॉवर बसवण्याच्या योजना लांबणीवर पडू शकतात, ज्यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीच्या समस्या जाणवू शकतात.
मोबाईल टॉवर उत्पादनात ‘गॅल्वनायझेशन’ ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
ही एक रासायनिक प्रक्रिया असून यात लोखंड किंवा स्टीलला जस्तचा (Zinc) संरक्षक थर दिला जातो.
यामुळे लोखंडाचा ओलावा आणि ऑक्सिजनशी थेट संपर्क तुटतो आणि टॉवरला गंज लागण्यापासून संरक्षण मिळते.
उघड्यावर आणि पावसापाण्यात राहणाऱ्या मोबाईल टॉवर्सचे आयुष्य वाढवण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य असते, ज्यासाठी उर्जेची (इंधन/गॅस) मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते.






