Weather Update : देशातील 16 राज्यांत मान्सून दाखल; 11 जूनपासून उत्तर भारतात पावसाला होणार सुरुवात (File Photo)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच थोड्या विश्रांतीनंतर नैऋत्य मान्सूनने वेग पकडला आहे. 4 जूनला केरळमध्ये दाखल झाल्यापासून मान्सून १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून उत्तर बंगालमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे केरळ, तामिळनाडू आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे.
11 जूनपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्ली-एनसीआरसह वायव्य भारताच्या काही भागांमध्ये आणि बिहारसह पूर्व भारताच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. सध्या, उत्तर भारतातील तापमान पुन्हा एकदा 45 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आता केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसामसह सर्व सात ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचला आहे.
Maharashtra Rain Alert : हे कसले नवीन संकट ! मोठा पाऊस येणार की नाही? वाचा सविस्तर…
पुढील तीन दिवसांत वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, तसेच उर्वरित ईशान्येकडील राज्ये आणि छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागांपर्यंत पाऊस पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
गेल्या २४ तासांत, उप-हिमालयातील पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम व मेघालयमध्ये तुरळक ठिकाणी १२-२० सेंमी पावसाची नोंद झाली. तसेच कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे तसेच किनारपट्टीवरील कर्नाटक, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा व तेलंगणा येथे तुरळक ठिकाणी ७-११ सेंमी पावसाची नोंद झाली.
उत्तर भारतात तीव्र उष्णता आणि आर्द्रता
उत्तर भारतात तीव्र उष्णता जाणवत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे तापमान ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सोमवारी श्रीगंगानगर हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण होते. दिल्लीत कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पूर्व उत्तर प्रदेशातील फतेहगडमध्ये ४४.८ अंश सेल्सिअस आणि वाराणसीमध्ये ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हरियाणातील रोहतक ठरले सर्वांत उष्ण
हरियाणातील रोहतक हे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानासह राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण होते. पंजाबमधील पतियाळामध्ये ४२.६ अंश सेल्सिअस आणि झारखंडमधील डाल्टनगंजमध्ये ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.






