Rahul Gandhi slams Narendra Modi
२०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) चांगले यश मिळाले. तेव्हापासून ते आजपर्यंत या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकत सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवले आहे. यावरूनच आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या गेल्या बारा वर्षातील कार्यकालावरून जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी यांनी X पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी सरकारच्या नीतीचा, धोरणांचा आणि परराष्ट्र घोरणांवरून चांगलीच टीका केली. ते म्हणाले, “गेल्या बारा वर्षांतील गरिबांच्या हिताच्या विरोधातील आर्थिक धोरणे आणि तडजोड केलेले परराष्ट्र धोरण यामुळे देशाला अशा स्थितीत आणले आहे की, लाखो गरीब कुटुंबे आणि महिलांना स्वयंपाकासाठी लाकडाच्या धुरावर (जो आरोग्यासाठी घातक असतो) अवलंबून राहावे लागत आहे. ‘उज्ज्वला योजने’अंतर्गत, अनुदानित सिलिंडर्सची संख्या नऊवरून चारवर आणण्यात आली. त्यातच भर म्हणून, गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे—याचा अर्थ असा की: आधी किमती वाढवायच्या, मग अनुदान कमी करायचे आणि परिणामी गरिबांच्या घरातील चुली विझवायच्या.”
12 वर्षों की गरीब-विरोधी आर्थिक नीतियों और compromised विदेश नीति ने आज देश को ऐसे हालात में ला खड़ा कर दिया है जहाँ लाखों गरीब परिवारों और महिलाओं को लकड़ी के ज़हरीले धुएं की तरफ धकेल दिया गया है। उज्ज्वला योजना में सब्सिडी वाले सिलेंडरों की संख्या 9 से घटाकर 4 कर दिया गया।… — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 9, 2026
“स्थलांतरित कामगारांसाठी आधारभूत ठरणाऱ्या ५-किलोच्या सिलिंडरची किंमतही ३२३ रुपयांनी वाढवण्यात आली आहे; अशा परिस्थितीत त्यांनी पैसे कमवायचे कसे, खायचे काय आणि बचत कशी करायची? आपल्या अब्जाधीश मित्रांची लाखो कोटींची कर्जे माफ करायची आणि स्वतःच्या अपयशाचा बोजा मात्र गरिबांवर लादायचा—हाच तर लूटमार करणारा ‘मोदी मॉडेल’ आहे. मोदी-जी, तुमच्या अपयशाचा भार काय फक्त गरीबच सोसणार आहेत? तुम्ही निर्माण केलेल्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांनाच मोजावी लागणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण भाष्य केले. “गेल्या १२ वर्षांत त्यांच्या सरकारने हाती घेतलेल्या विविध कल्याणकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला. भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरिबांचे कल्याण आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मोदींनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, स्वच्छ भारत, पीएम आवास योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “हे सर्व उपक्रम लोकांना सन्मान आणि संधी देण्याच्या साध्या उद्देशाने प्रेरित आहेत. गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचे कल्याण आहे,” असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले.
‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान






