Maharashtra Breaking News Updates Today
नवी दिल्ली:
नीट पेपरफुटीविरोधात (NEET Paper Leak) तब्बल २६ दिवस अन्नत्याग करून उपोषण (Hunger Strike) करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. उपोषण मागे घेतल्यावरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला आणि त्यांना ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत तीव्र शब्दांत सडेतोड उत्तर दिले आहे.
व्हिडिओमध्ये अत्यंत संताप व्यक्त करत सोनम वांगचुक यांनी प्रश्न उपस्थित केला.
“२६ दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणानंतरही मला काय सिद्ध करायचे आहे? मी उपोषण सोडल्याबद्दल माझ्यावर इतके प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? तब्बल २६ दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझ्या या पवित्र आंदोलनाबद्दलची प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर मला सरकारशी तडजोडच करायची असती, तर एवढे दिवस उपोषण करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता.”
25 Jul 2026 09:55 AM (IST)
NEET UG 2026 Paper Leak: देशभरात ‘नीट यूजी २०२६’ पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. केंद्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. ते विनीत जोशी यांची जागा घेतील, ज्यांची सचिव स्तरावरील मोठ्या प्रशासकीय बदलांतर्गत पंचायती राज मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. या नियुक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव नरेश पाल गंगवार कोण आहेत, त्यांचे शिक्षण कुठे झाले आणि त्यांना किती वेतन मिळणार, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
25 Jul 2026 09:45 AM (IST)
भारतात 25 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,432 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,229 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,824 रुपये आहे. भारतात 25 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,320 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,240 रुपये आहे. भारतात 25 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये आहे.
25 Jul 2026 09:35 AM (IST)
iQOO Z11 Lite 5G Launched: टेक कंपनी iQOO ने भारतात बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन iQOO Z11 Lite 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये एआय पावर्ड फीचर, मोठी बॅटरी आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. नव्या स्मार्टफोनची विक्री कधी सुरु होणार आहे आणि कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
25 Jul 2026 09:10 AM (IST)
Black Sea Attack: काळा समुद्र (Black Sea) क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या एका व्यापारी जहाजावर (Commercial Ship) झालेल्या क्षेपणास्त्र/ड्रोन हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिली आहे. रशियन सागरी हद्दीत १८ जुलै रोजी ही घटना घडल्याचे शुक्रवारी उशिरा जारी केलेल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'एमव्ही ओमॉर्फी' (MV OMORFI) असे हल्ला झालेल्या व्यापारी जहाजाचे नाव आहे.हल्ल्याच्या वेळी या जहाजावर एकूण १० खलाशी (Crew Members) तैनात होते. हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, जहाजावरील इतर दोन भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
25 Jul 2026 08:52 AM (IST)
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आणि शिक्षण व्यवस्थेच्या ‘अधोगती ‘विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या आणि जबाबदारीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानत आहे. त्यांचा आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा वापर करत आहे, असा आरोप काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केला.
एका लेखात त्यांनी असेही म्हटले आहे की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या साध्या आणि स्पष्ट आहेत. शिक्षणात सुधारणा करा. सोनिया गांधी यांनी आरोप केला की, मोदी सरकारने त्यांच्या शौर्याला भ्याडपणाने आणि निर्दयी क्रूरतेने प्रत्युत्तर दिले आहे, त्यांना भावी नेते म्हणून नव्हे, तर राष्ट्राचे शत्रू म्हणून वागवले आहे. त्यांनी आरोप केला की, मोदी सरकार संवादाऐवजी नेहमीच हिंसेचा वापर करते आणि शेतकऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा विरोध दडपून टाकण्याची स्पष्ट प्रवृत्ती दाखवते. आपल्या भावी डॉक्टर आणि इंजिनिअर, शिक्षक आणि लोकसेवक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना समजून घेण्याऐवजी, सरकारने त्यांच्याविरुद्ध राज्याच्या दडपशाही शक्तीचा वापर केला, असे सोनिया गांधी यांनी लिहिले.
25 Jul 2026 08:51 AM (IST)
Ashadhi Ekadashi: ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमली आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा सोहळा शनिवारी (दि.25) पहाटे पार पडला. पहाटे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक विधींनुसार हा सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा करण्यात आली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव ) यांना महापुजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थनाही केली.






