नितीश कुमार राज्यसभेमध्ये गेल्यानंतर बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगली आहे (फोटो - सोशल मीडिया)
राज्यसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या असून यामुळे वेगवेगळी राजकीय समीकरणे समोर आली आहेत. गेल्या दोन दशकांपासून बिहारच्या राजकाऱणामध्ये किंगमेकर ठरल्यानंतर आता, नितीश कुमार यांचे अनेक वर्षांचे संसदीय कामकाजाचे स्वप्न लवकरच पुर्ण होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळणार की अनुभवी व्यक्ती पद सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर बिहारच्या राजकारणामध्ये घराणेशाही असल्यामुळे नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार? बिहारच्या राजकारणात काय आहे गेम चेंजर प्लॅन!
सम्राट चौधरी
जर नितीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडले तर सम्राट चौधरी हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. ८९ आमदारांसह भाजप हा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष आहे आणि सम्राट चौधरी यांच्याकडे अर्थ, आरोग्य, नगरविकास आणि गृहखाते अशी महत्त्वाची खाती आहेत. ते भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देखील आहेत आणि पक्ष संघटनेत त्यांची मजबूत पकड आहे.
विजय सिन्हा
विजय सिन्हा हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, परंतु भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून ते सम्राट चौधरी यांच्यापेक्षा थोडे मागे मानले जातात. ते तेजस्वी यादव यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि त्यांच्या आक्रमक शैलीमुळे राजकीय वर्तुळामध्ये लोकप्रियता मिळवली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याची आणि माफियांवर कठोर कारवाई करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे.
हे देखील वाचा : नितीश कुमार यांचा मुलगा निशांतची राजकारणात एन्ट्री; JDUमध्ये मोठी खांदेपालट होणार?
निशांत कुमार
निशांत कुमार यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी सक्रीय राजकारणामध्ये एन्ट्री झाली आहे. मात्र तरीही घराणेशाहीमुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. मात्र अनुभव कमी असल्यामुळे मुख्यमंत्री नाही तर ते उपमुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना राजकारणात नवीन मानले जाते आणि अद्याप त्यांचा मतदारांचा आधार नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी त्यांचे वडील नितीश कुमार यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आणि त्यांना एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले होते.






