वयाच्या तिशीनंतर महिलांनी आहारात करायला हव्यात 'या' विटामिन युक्त पदार्थांचे सेवन, चेहऱ्यावर तारुण्य राहील कायम टिकून
कामाच्या धावपळीमध्ये सर्वच महिला स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. घर, ऑफिस आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात महिलांचा संपूर्ण वेळ निघून जातो. मात्र सततच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कायमच हेल्दी आणि तरुण राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात बदल होतात. हार्मोन्सचे असंतुलन, मासिक पाळीच्या समस्या, कामाचा वाढलेला ताण, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे महिला खूप जास्त चिडचिड्या आणि अस्वस्थ होऊन जातात. त्यामुळे कायमच निरोगी राहण्यासाठी वयाच्या तिशीनंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात या पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास कायमच तुम्ही हेल्दी आणि तरुण राहाल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होऊन लागते. यामुळे चेहऱ्यावर तरुण वयातच सुरकुत्या येणे, बारीक रेषा, पिंपल्सचे काळे डाग, त्वचा सैल पडणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात. पण कामाच्या धावपळीमुळे आणि कौटुंबिक जबाबऱ्यांमुळे दुर्लक्ष केले जाते. पण चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. कोलेजन वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि चेहरा खूप जास्त तरुण दिसतो.
कोलेजन वाढवण्यासाठी आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. पनीर, दही, मूगडाळ, राजमा, चणे, सोयाबीन, टोफू, ड्रायफ्रूट्स आणि नट्स इत्यादी पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. सतत कोणत्याही जंक फूडचे किंवा तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बायोटिन आणि झिंक शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, केस गळणे, नख कमकुवत होणे यांसारख्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी झिंक असलेले पदार्थ खावेत. बदाम, भोपळ्याच्या बिया, तीळ, मशरूम आणि अंड्याचा पांढरा खाल्ल्यास शरीराला मुबलक प्रमाणात झिंक मिळेल.
हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, सांधिवात, सांध्यांमध्ये वेदना इत्यादी लक्षणे ओमेगा-३ फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे जाणवू लागतात. ही लक्षणे शरीरात दिसून लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध घेतात. मात्र फारसा बदल दिसून येत नाही. त्याऐवजी आहारात बदलणे करणे आवश्यक आहे. अळशीचे बी, चिया सीड्स, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी विटामिन सी असलेले पदार्थ खावेत.






