महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीमध्ये लग्न केवळ दोन व्यक्तींचे किंवा कुटुंबांचे मिलन नसून, ते संपूर्ण गावाचा आणि कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठीचे असतात. याच विवाहसंस्कारातील एक अत्यंत महत्त्वाची, पारंपारिक आणि काहीशी दुर्लक्षित पण तितकीच इंटरेस्टिंग प्री-वेडिंग विधी म्हणजे ‘घूगुळ’ होय. प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही विशिष्ट समाजांमध्ये आणि ग्रामीण भागात लग्नकार्याची सुरुवात अधिकृतपणे याच विधीने केली जाते.
घूगुळ शब्दाचा अर्थ
घूगुळ या शब्दाचा संबंध थेट ‘गुग्गुळ’ किंवा ‘धूप’ या सुवासिक द्रव्याशी आणि कुलदैवताच्या पूजेशी आहे. लग्न ठरल्यानंतर, लग्नपत्रिकेतील पहिली पत्रिका कुलदैवताला अर्पण करण्यापूर्वी किंवा हळदीच्या विधीच्या आधी हा विधी साजरा केला जातो. या विधीचा मुख्य उद्देश नवीन जोडप्याच्या भावी आयुष्यासाठी आणि लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपल्या कुलदैवताला आमंत्रित करणे हा असतो.
‘कडक लक्ष्मी’! वेदना विसरून लोकसंस्कृतीचा रांगडा बाणा जपणारी महाराष्ट्रातील अनोखी लोककला!
घूगुळ विधीचे विश्लेषण
या विधीदरम्यान घराच्या अंगणात किंवा मध्यभागी एक पूजा मांडली जाते. वधु किंवा वराचे आई-वडील आणि घरातील सुवासिनी एकत्र येऊन देव्हाऱ्याची आणि कुलदैवताचे टाक पूजतात. एका मातीच्या किंवा धातूच्या पात्रात निखारे ठेवून त्यावर गुग्गुळ आणि धूप टाकला जातो. या धुपाचा सुवासिक आणि पवित्र धूर संपूर्ण घरभर पसरवला जातो, ज्याला ‘घूगुळ धरणे’ म्हणतात. असे मानले जाते की या धुपाच्या पवित्र धुरामुळे घरातील आणि लग्नमंडपातील सर्व नकारात्मक ऊर्जा, अनिष्ट शक्ती दूर होतात आणि वातावरण शुद्ध होते. यानंतर पारंपरिक गाणी आणि कुलदैवताचा गजर करत जसे कि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जागर करत देवाला नैवेद्य दाखवला जातो.
प्रेम आणि आनंद जपणारी परंपरा
ही परंपरा केवळ धार्मिक नसून कौटुंबिक स्नेह-प्रेम वाढवणारी आहे, कारण या निमित्ताने लग्नाची पहिली विधी म्हणून जवळचे नातेवाईक आणि मानकरी एकत्र येतात. आधुनिक काळात जरी प्री-वेडिंग फोटोशूट आणि इतर पाश्चात्त्य पद्धतींचे फॅड आले असले, तरी महाराष्ट्राच्या मातीतील ‘घूगुळ’ सारख्या परंपरा आपल्या मूळ संस्कृतीशी आपले नाते घट्ट ठेवतात. लग्नकार्याची पवित्र सुरुवात करून देणारी ही परंपरा आजही ग्रामीण भागातील लग्नांची खरी ओळख आहे म्हणायला हरकत नाही.






