पावसाळ्यात पाणी सालचल्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो. काळात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोकाही लक्षणीयरीत्या वाढतो. डासांमुळे पसरणारा डेंग्यू हा भारतातील गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न मानला जातो. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागते. अशा परिस्थितीत भारताला डेंग्यूविरुद्धची पहिली अधिकृत लस मिळाली आहे. भारतीय औषध नियंत्रक प्राधिकरणाकडून QDENGA (TAK-003) या लसीला मंजुरी मिळाल्याने डेंग्यू नियंत्रणासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतात ३२,००० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत सांगितले की, २०२३ मध्ये यापूर्वी १८,३९१ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली होती.
दररोजच्या ‘या’ सवयी किडनी आणि लिव्हरसाठी ठरू शकतात घातक; वेळेत बदला जीवनशैली
गंभीर प्रकरणांमध्ये, डेंग्यूमुळे अंतर्गत रक्तस्रावाचा धोकाही वाढतो, जो प्राणघातक ठरू शकतो. या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, भारतात डेंग्यूबाबत एक मोठे यश मिळाले आहे. जपानची औषध कंपनी टाकेडा फार्मास्युटिकल्सच्या ‘क्यूडेंगा’ (Qdenga) या डेंग्यू लसीला भारतीय औषध नियामकाकडून मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे, भारतात मंजूर झालेली ही पहिली डेंग्यू लस आहे.
QDENGA Vaccine ही डेंग्यूपासून बचावासाठी विकसित करण्यात आलेली लस आहे. या लसीमुळे डेंग्यू विषाणूच्या चारही प्रकारांपासून संरक्षण मिळणार आहे.. भारतात ही लस ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींना वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही लस घेण्यासाठी यापूर्वी डेंग्यू झाला होता की नाही, याची स्वतंत्र चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे. टाकेडाने भारतीय कंपनी बायोलॉजिकल-ईच्या सहकार्याने या लसीच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाची तयारीही सुरू केली आहे. ही मंजुरी अशा वेळी मिळाली आहे, जेव्हा भारतात गेल्या २० वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. दरवर्षी हजारो लोक या आजाराला बळी पडतात आणि अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, क्यूडेंगा (QDENGA) ही एक टेट्राव्हॅलेंट लाइव्ह-अटेन्यूएटेड लस आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ही लस डेंग्यू विषाणूच्या चारही प्रकारांपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये विषाणूच्या कमकुवत स्वरूपाचा वापर केला जातो, जेणेकरून शरीराची रोगप्रतिकारशक्ती त्या विषाणूला ओळखायला आणि त्याच्याशी लढायला शिकेल, पण त्यामुळे कोणताही आजार होणार नाही.
कंपनीचे म्हणणे आहे की, भारतात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही मंजुरी अत्यंत महत्त्वाच्या वेळी मिळाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या दोन दशकांत भारतातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जवळपास ११ पटींनी वाढ झाली आहे.
भारतात दरवर्षी लाखो नागरिकांना डेंग्यूची लागण होते. गंभीर संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणे ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. यामुळे गंभीर रुग्णांची संख्या कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, लस उपलब्ध झाली असली तरी डासांची पैदास रोखणे, साचलेले पाणी हटवणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आणि डासांपासून संरक्षण करणारी साधने वापरणे तितकेच महत्त्वाचे आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी लसीकरणासोबत स्वच्छता आणि जनजागृतीचीही गरज कायम राहणार आहे.
Skin Care Tips: वाढत्या वयातही त्वचा राहील तजेलदार, ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो; चेहरा चमकेल






