Menopause: कार्यालयातही मेनोपॉजबाबत विचार होणं आवश्यक, काय सांगतात तज्ज्ञ
देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. या प्रगतीची कास धरताना विविधता तसेच सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले गेले. मात्र, रजोनिवृत्ती या महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याबाबत आजही अनेक कार्यालयीन स्थळांवर गरजेनुसार दखल घेतली गेलेली नाही. रजोनिवृत्ती हा असामान्य किंवा दुर्मिळ असा टप्पा नाही. रजोनिवृत्ती हा टप्पा शारिरीक बदलांसह, मानसिक आरोग्य आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणावरही निगडीत असतो. दुर्दैवाने अनेक कंपन्या आजही या तिन्ही घटकांची सांगड घालण्यास अजूनही कमी पडत आहेत.याबद्दल डॉ. दिव्यांग दोशी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप आणि प्रियंका जैस्वाल, मानसोपचारतज्ज्ञ, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात उष्णता जाणवणे, थकवा येणे किंवा झोप न येणे या लक्षणांपूरतेच रजोनिवृत्तीला पाहिले जाते. मात्र, रजोनिवृत्तीचा परिणाम केवळ शरीरावरच होत नाही. हार्मोनल बदलांमुळे महिलांचे मानसिक आरोग्य बिघडते. वैचारिक क्षमता घटते. अनेक महिलांचा गोंधळ उडतो, रोजच्या कामकाजात नाहक चीडचीड होते. या सततच्या गोंधळामुळे आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते. त्यामुळे रजोनिवृत्ती हा केवळ शारिरीक बदलांचा टप्पा असे न मानता, महिलांच्या एकूण आरोग्याच्या तसेच भावनिक अंतरमनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
रजोनिवृत्ती सुरु होण्याचा काळ हा महिलांच्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यात सुरु होतो. या काळात महिला अनेक आघाड्यांवर काम करत असतात. रजोनिवृत्तीचा सामना करताना त्या कार्यालयीन कामकाजाचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर कामाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय तसेच संस्थेच्या प्रगतीत धोरणात्मक योगदान देण्याची जबाबदारी सोपवली असते. कामाचा ओघ लक्षात घेत कार्यालयीन कामकाजांत तसेच दैनंदिन व्यवहारात रजोनिवृत्तीच्या टप्प्यातील महिलांबाबत संवेदनशील दृष्टीकोन बाळगायला हवा.
रजोनिवृत्तीमुळे होणारे परिणाम प्रत्यक्षरित्या दिसून येत नाही. महिलांचा कामातील सहभाग अचानकपणे कमी होतो. कित्येकदा त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो, कामातील सक्रियता कमी होते. काही महिला पदोन्नती किंवा नेतृत्वाच्या नव्या संधी नाकारतात. यामागे केवळ रजोनिवृत्तीमुळे होणारे मानसिक बदल कारणीभूत असतात. नेतृत्वगुणाचे कौशल्य असूनही त्या नव्या संधींपासून स्वतःला दूर सारतात. सहका-यांकडून आवश्यक पाठबळ न मिळणे, कार्यालयीन स्तरावरील नकारात्मकता आणि इतरांकडून मिळणारे असहकार्य हे त्यामागील प्रमुख कारण असते.
रजोनिवृत्तीचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी वेगळा असतो. प्रत्येक महिलेच्या शरीराची रचना सारखी नसते. काही महिलांना सौम्य लक्षणे जाणवतात. तर काही महिलांना सतत थकवा, चिंता, झोप न लागणे, मानसिक गोंधळ अशा समस्यांचा सामना करावा लागतो. रजोनिवृत्तीचा परिणाम प्रत्येक महिलेवर वेगवेगळा दिसून येतो.
आपल्या देशात आजही रजोनिवृत्तीबाबत खुलेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळे ही समस्या आजही गंभीर स्वरुपात दिसून येते. अनेक महिला आपल्या अडचणींविषयी बोलणे टाळतात. या टप्प्याबद्दल चर्चा केल्यास आपण अशक्त असल्याचा समज होईल, अशी त्यांना भीती असते. परिणामी, मानसिक आणि शारिरीक ताण वाढत जातो. यामुळे कामाचा ताण, कामातील उत्पादकता कमी होणे तसेच अनुभवी आणि कुशल महिला कर्मचा-यांचे निष्कासन होण्याची शक्यता वाढते.
विविधता, समानता आणि सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून हा खूप मोठा अडथळा आहे. कंपन्यांनी महिलांची भरती करण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी मोठे प्रयत्न करायला हवेत. वरिष्ठ आणि नेतृत्व पदांवरील महिलांना कंपनीत टिकवून ठेवणे अनेक कंपन्यांना झेपत नाही. रजोनिवृत्तीकडे दुर्लक्ष करणे हे महिलांच्या करिअरच्या प्रवासावर परिणाम करणा-या महत्त्वाच्या घटकाकडे केलेले दुर्लक्ष असते. कंपन्यांनी आपापल्या कार्यालयीन ठिकाणी सर्वसमावेशक संस्कृती तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याकरिता जागरुकता निर्माण करायला हवी. यामध्ये नेतृत्व स्तरावरील संवेदनशीलता, महिलांना आरोग्य व मानसिक आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करुन देणे आणि बदल्या गरजांनुसार लवचिक कामकाजाच्या पद्धती स्विकारणे महत्त्वाचे ठरते. कामच्या ठिकाणी होणा-या दुर्लक्षित गोष्टींचे मूल्यमापन व्हायला हवे. या समस्या जाणून घेतल्याशिवाय अपेक्षित बदल घडणार नाही.
महिलांना नोकरी देणे म्हणजे सर्वसमावेशकता नव्हे. कार्यालयीन ठिकाणी त्यांना योग्य वागणूक मिळण्यासाठी तसेच त्यांची नेतृत्वाच्या भूमिकेत प्रगती व्हावी यासाठी आवश्यक वातावरणही निर्माण करायला हवे. रजोनिवृत्तीबद्दल खुलेपणाने चर्चा करणे म्हणजे सहानुभूती नव्हे. ही चर्चा महिलांना त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे महिलांना नेतृत्वाच्या संधीही उपलब्ध होतात. संस्थेच्या विकासासाठी ही चर्चा घडायला हवी. रजोनिवृत्तीबद्दल मौन न बाळगता खुलेपणाने संवाद करायला हवा.
Ans: मेनोपॉज म्हणजे महिलांची मासिक पाळी सलग १२ महिने बंद राहिल्यानंतरचा नैसर्गिक टप्पा. साधारणपणे ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यान हा बदल होतो.
Ans: हॉट फ्लॅशेस, जास्त घाम येणे, झोपेचा त्रास, थकवा, एकाग्रतेत घट आणि मूडमध्ये बदल यामुळे काही महिलांना कामाच्या ठिकाणी अडचणी जाणवू शकतात.
Ans: संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव कमी करण्यासाठी योग किंवा ध्यान, तसेच लक्षणे तीव्र असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.






