नाले स्वच्छतेसाठी १५ कोटी रुपये! प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी; यंत्र देखभालीसाठी कंत्राट का?
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, बीएमसीच्या पर्जन्यजल निचरा विभागाने भूमिगत नाले आणि गटार स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च – क्षमतेच्या सक्शन-कम-जेटिंग यंत्रांच्या संचालन आणि देखभालीसाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या कंत्राट प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रस्तावानुसार, ही विशेष यंत्रे मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये नियमित नाले स्वच्छतेसाठी वापरली जातात. ही यंत्रे नाले आणि पाईपलाईनमधून गाळ, कचरा आणि इतर अडथळे दूर करून पाण्याचा सुरळीत प्रवाह राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याबाबत त्यांनी, ‘देखभाल करण्यासाठी बीएमसीकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.(फोटो सौजन्य – AI)
Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट
विभागाकडे सध्या अशी एकूण ७ यत्रे आहेत, त्यापैकी ३ २०२३ मध्ये आणि ४ २०२४ मध्ये खरेदी करण्यात आली होती. २०२४ मध्ये खरेदी केलेल्या ४ यंत्रांच्या संचालन आणि देखभालीचे सध्याचे कंत्राट लवकरच संपणार आहे.त्यामुळे, पुढील ३ वर्षांसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करणे आवश्यक मानले गेले आहे. या टेंडरमध्ये ३ कंपन्यांनी भाग घेतला होता,ॲकॉर्ड वॉटरटेक अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., ओरिजिन क्लीनिंग सर्व्हिसेस प्रा. लि… आणि आयर्न पंप ॲड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. तांत्रिक छाननीनंतर. या सर्व कंपन्या पात्र ठरल्या. ॲकॉर्ड वॉटरटेक ॲड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ने इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी, १५३.८ दशलक्ष रुपयांची बोली लावली. प्रस्तावित कंत्राटाचा कालावधी ३ वर्षे किंवा यंत्रांचे ४,५०० ऑपरेटिंग तास, यापैकी जे आधी येईल, तो निश्चित करण्यात आला आहे.
शुक्रवारी, स्थायी समितीच्या सदस्यांनी देखभाल कंत्राट देण्यावर तीव्र आक्षेप घेतला. मनसे गट नेते यशवंत किल्लेदार यांनी बीएमसी आयुक्तांना प्रश्न विचारला की, देखभालीसाठी केवळ १५ कोटी रुपये का मंजूर केले जात आहेत?, जर यंत्रसामग्री बीएमसीची असेल, तर हे कंत्राट बाहेरच्यांना का दिले जात आहे? जर बीएमसीने आपल्या कर्मचाऱ्यांची कौशल्ये विकसित केली, तर पैशांची बचत होईल. तसेच एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी म्हणाले की, बीएमसीने स्वतःची उपकरणे वापरायला शिकले पाहिजे. कंत्राटे देणे हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या कंत्राटाचे समर्थन करताना, पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ केले जातात, आम्हाला काम थांबवायचे नाही, असे ते म्हणाले.






