श्रीरामपूर : शहरातील अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या (Ahmednagar District Central Bank) आवारात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अशोक सहकारी बँकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते. दरम्यान, सुरक्षारक्षक, दशरथ कारभारी पुजारी हे बँकेबाहेरील एटीएमसमोर बसलेले असताना अचानक त्यांच्याजवळील रायफलमधील गोळी सुटल्याने बँकेत कामासाठी आलेल्या अजित विजय जोशी (वय 42) यांना सुटलेली गोळी लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ही दुर्घटना कशी झाली? याबाबत त्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. ही घटना शहर मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षारक्षकास विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून, मयत अजित जोशी हे प्रगत शेतकरी असून, ते वार्ड नंबर ७ मधील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.