नाशिक कुंभमेळ्यासाठी तपोवन वृक्षतोड विरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका घेतली (फोटो - सोशल मीडिया)
तपोवनाच्या वृक्षतोडीच्या विरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सयाजी शिंदे म्हणाले की, मी जागरूक नाशिककरांना पाठिंबा द्यायला गेलो होते. जिथे झाडं तुटतील तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. उजाड माळरानाच्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार. तिथे झाडं नाहीत, कारण तिथली माती चांगली नाही. तिथे कुंभ मेळा भरवला पाहिजे. निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का,” अशा शब्दांत सयाजी शिंदे यांनी सवाल उपस्थित केला.
हे देखील वाचा : निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट
वृक्षतोडीविरोधात भूमिका घेत अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारणाबदल माझा अभ्यास नाही, पण झाडाबद्दल राजकारण करू नका. अजितदादांनी पाठिंबा दिला तसा भाजपच्याही काही लोकांनी पाठिंबा दिला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची.. एवढी मोठी पळवाट शोधू नका. चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत. झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. सगळं आनंदाने व्हावं, असे स्पष्ट मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
त्यांना त्याचं लखलाभ…
पुढे ते म्हणाले की, “साधू आले-गेले काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर फरक पडतो, असं वक्तव्य सयाजी शिंदेंनी केलं होतं. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी साधू-संतांचा अपमान सहन करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यावर आपण आपले बरे आहोत तिथे खरे, असं प्रत्युत्तर सयाजी शिंदेंनी दिलं. बाकीचे लोक काय बोलतात, त्यांचं त्यांनाच धन्यवाद. त्यांना त्याचं लखलाभ, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही”, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिला.
हे देखील वाचा : पार्टनरला अटक का नाही? पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अंबादास दानवे यांचे सरकारला चार प्रश्न
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या वृक्षतोडीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी लिहिले आहे की, “तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे,” असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.






