तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांचे वारे राज्यभर; मात्र वाईत अजूनही 'सब कुछ ठीक है'चे चित्र?
वाई/सचिन ननावरे : वाई शहर आणि तालुक्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ खाद्यव्यवसाय, निकृष्ट दर्जाच्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर, अवैध गुटखा विक्री आणि नियमबाह्य खाद्यव्यवसायांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असताना अन्न व औषध प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यभर धडक कारवायांचा गाजावाजा होत असताना वाईत मात्र अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रभावी कारवाई का झाली नाही, असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहरातील हातगाड्या, चायनीज स्टॉल, फास्टफूड सेंटर, फळ विक्रेते, ज्यूस सेंटर, मिठाई दुकाने तसेच हॉटेल व्यवसायांमध्ये स्वच्छतेचे निकष कितपत पाळले जातात, याची नियमित तपासणी होत असल्याचे चित्र दिसत नाही. अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री, दूषित पाण्याचा वापर, अनेक दिवस वापरलेले तेल आणि अस्वच्छ भांड्यांमध्ये अन्न तयार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
विशेष म्हणजे वाई शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि मोठ्या समारंभांमध्ये एकावेळी हजारो लोकांसाठी जेवण तयार केले जाते. या स्वयंपाकात वापरले जाणारे पनीर, खवा, दूध, तूप, तेल आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता कोण तपासते? वापरले जाणारे पनीर खरोखरच दर्जेदार आहे का? दूध आणि खवा भेसळमुक्त आहेत का? स्वयंपाकगृहांची स्वच्छता, साठवणूक व्यवस्था आणि अन्नसुरक्षा नियमांची अंमलबजावणी तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने किती वेळा प्रत्यक्ष भेटी दिल्या? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे नागरिकांना मिळत नाहीत.
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईची विक्री होते. मात्र मिठाई बनवण्यासाठी वापरला जाणारा खवा, दूध, कृत्रिम रंग, स्वादवर्धक रसायने आणि इतर घटकांची तपासणी कितपत केली जाते? गेल्या पाच वर्षांत वाई शहरातून किती नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले? त्यापैकी किती नमुने निकृष्ट किंवा भेसळयुक्त आढळले? दोषींवर किती कारवाई झाली? ही माहिती सार्वजनिक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
राज्यात गुटखाबंदी लागू असताना वाई शहरातील अनेक भागांत आजही खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काही किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि इतर माध्यमांतून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. शालेय विद्यार्थी आणि तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना प्रशासनाची कारवाई मात्र अपुरी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
अलीकडे करण्यात आलेल्या काही कारवाया केवळ आकडेवारीसाठी आणि वरिष्ठांना अहवाल सादर करण्यापुरत्याच मर्यादित असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. जर गुटख्याचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला असेल, तर शहरात तो आजही सहज उपलब्ध कसा होतो, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
वाई शहरात सुरू असलेल्या काही अवैध धंद्यांना संबंधित विभागातील काही घटकांचे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये उघडपणे होत आहे. या चर्चेत तथ्य किती आहे, याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची आवश्यकता असल्याची मागणी पुढे येत आहे. कारण कारवाईच्या नावाखाली छोटे विक्रेते लक्ष्य होत असताना मोठ्या साखळ्यांपर्यंत प्रशासनाचा हात पोहोचत नसल्याचा आरोप केला जात आहे.
ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छापे, नमुना तपासण्या आणि कठोर कारवाया करण्यात आल्या आहेत. मग वाई तालुका आणि सातारा जिल्ह्यात अशाच व्यापक आणि संयुक्त मोहिमा का राबविल्या जात नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.
वाईकर जनतेचा प्रश्न सरळ आहे – जर शहरात इतक्या वर्षांपासून भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ खाद्यव्यवसाय आणि गुटख्याचा अवैध व्यापार सुरू होता, तर अन्न व औषध प्रशासनाला हे दिसले नाही का? की जाणूनबुजून डोळेझाक करण्यात आली?






