राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा
केली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. विशेष म्हणजे, यापुर्वी कर्जमाफीच्या लाभ घेतलेल्या काही पात्र
शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरुवातीला जूनअखेरपर्यंत कर्जमाफी लागू होईल, अशी चर्चा होती. त्यानंतर जुलैच्या पाहिल्या आठवड्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र विविध प्रशासकीय कारणांमुळे हा निर्णय पुन्हा पुढे ढकलला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून सरकारकडून स्पष्ट तारीख जाहीर होण्याची मागणी होत आहे.
दरम्यान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणणण्यानुसार, जुलै महिना संपण्यापुर्वी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली असून, काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जमाफी उशिरा होण्यामागे काही तांत्रिक अडचणी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. विशेषतः आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची
माहिती केंद्र सरकारकडून मागवण्यात आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच अंतिम यादी तयार होणार आहे. सरकारच्या नव्या
धोरणानुसार आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि लहान शेतकऱ्यांनाच
प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.
पुन्हा मोठी कारवाई होणार ! तुकाराम मुंढेंनी हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिला ‘हा’ इशारा
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही या विषयावर सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या मते, पात्र लाभार्थी निश्चित
करण्यासाठी सरकारला जास्त वेळ लागत आहे. यापूर्वीही विविध योजनांमध्ये लाभार्थ्यांची माहिती तपासण्यासाठी अनेक महिने
लागले होते. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेलाही विलंब होत असल्याचा त्यांचा दावा आहे.
रोहित पवारांनी सरकारला इशाराही दिला आहे. ऑगस्टपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या
प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सरकार पुढील काही दिवसांत कोणता
निर्णय घेते, याकडे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी शेतकरी केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवून वाट पाहत आहेत. सरकारने दिलेल्या नव्या मुदतीनुसार जुलैअखेरीस कर्जमाफीचा मार्ग मोकळा होतो का, की पुन्हा एकदा निर्णय पुढे ढकलला जातो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
Maharashtra IMD Alert: विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय? मुंबईसह ‘या’ ९ जिल्ह्यांना पावसाचा इशारा






