अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग
अमरावती शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विस्तारित जलपुरवठा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ४४ टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुमारे ९८५.२६ कोटी रुपये खर्चुन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, सध्या पावसाळ्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम झाला असून, पावसाळा संपल्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा कामाला वेग दिला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेअंतर्गत तपोवन येथून प्रस्तावित नवीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ९ किलोमीटर लांबीची मुख्य ग्रॅव्हिटी पाइपलाइन टाकण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – AI)
जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध जलकुंभांपर्यंत ३२.६३ किलोमीटर लांबीची पाइपलाइन प्रस्तावित असून, त्यापैकी ८ किलोमीटरहून अधिक काम पूर्ण झाले आहे. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये २० किलोमीटर नवीन वितरण पाइपलाइन टाकण्यात येणार असून, हे काम लवकरच सुरू होणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, हा प्रकल्प सन २०५५ पर्यंतच्या अंदाजित १४.५१ लाख लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराची जलपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि कार्यक्षम होणार आहे.
सध्या पावसाळ्यामुळे विस्तारित जलपुरवठा प्रकल्पाच्या कामावर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, पावसाळा संपताच आणि दिवाळीनंतर प्रकल्पाची सर्व कामे पुन्हा वेगाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराची जलपुरवठा व्यवस्था अधिक आधुनिक, सक्षम आणि कार्यक्षम होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत महादेवखोरी येथे ७० एमएलडी क्षमतेचे तिसरे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. तसेच शहरातील विविध भागांत १० लाख लिटर क्षमतेचे व १५ मीटर उंचीचे १५ नवीन जलकुंभ उभारले जाणार आहेत. त्यापैकी ८ जलकुंभांचे बांधकाम सुरू झाले आहे. सध्या बडनेरा येथील जनक रेसिडेन्सी, राजापेठमधील श्रद्धा नगर, रेल्वे लाईन परिसरातील श्याम विहार, बडनेरा रोडवरील अनंतवाडी, जमील कॉलनी, नवसारी पॉवर स्टेशन आणि रहाटगाव येथे जलकुंभ उभारणीची कामे सुरू आहेत.
स्मार्ट वॉटर सिस्टीमशी जोडली जाणार 66 सपूर्ण व्यवस्था प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सपूर्ण जलवितरण व्यवस्था ऑटोमेशनवर आधारित स्मार्ट वॉटर सिस्टीमशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जलपुरवठ्याचे नियंत्रण, देखरेख आणि व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मात्र, या स्मार्ट प्रणालीच्या अंमलबजावणीचे काम अद्याप सुरू झालेले नाही, अशी माहिती संजय लेवरकर, उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.






