Chandrapur News: मूल तलावावर मालधक्का प्रकल्पाचे सावट; पर्यावरण आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर संकट
बसस्थानकाच्या शेजारी आणि गडचिरोली महामार्गालगत वसलेला हा तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. या तलावावर अनेक मासेमार कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय अवलंबून आहे. मत्स्यपालन सोसायटीमार्फत मासेमारीचे हक्क देण्यात आले असून पिढ्यानपिढ्या ढिवर समाजातील कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो.
माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरात आयरन खनिज वाहतुकीसाठी मालधक्का सुरू करण्याबाबत निवेदन दिल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. नागरिकांच्या मते, मालधक्का सुरू झाल्यास तलावाच्या काठाने मोठ्या प्रमाणावर ट्रकची वाहतूक होईल. या ट्रकमधून उडणारी धूळ व खनिजकण तलावात मिसळल्यास पाणी प्रदूषित होऊन मत्स्यसंपत्तीला मोठा फटका बसू शकतो.
मत्स्य उत्पादन घटल्यास किंवा मासेमारी ठप्प झाल्यास ढिवर समाजातील शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. रोजगाराचा दुसरा पर्याय नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे स्थानिक मासेमारांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
हा तलाव केवळ उपजीविकेचे साधन नसून शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा केंद्रबिंदूही आहे. येथे दरवर्षी गणेश विसर्जन, दुगां विसर्जन, शारदा विसर्जन आणि गौरी विसर्जन मोठ्या श्रद्धेने पार पडते. तलाव प्रदूषित झाल्यास या परंपरांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मासेमार समाजाने प्रशासनाने प्रस्तावाचा पुनर्विचार करून पर्यावरण, रोजगार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची मागणी केली आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या अस्तित्वावर गदा येऊ नये, अशी भावना शहरात व्यक्त होत आहे.
चंद्रपूरच्या मूल शहरातील ऐतिहासिक तलावावर मालधक्का प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावामुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकल्पामुळे तलावाचे प्रदूषण होऊन मासेमारी व्यवसाय आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, या तलावाशी जोडलेल्या सांस्कृतिक परंपरांनाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.






