छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार
ढोरकीन येथे स्क्रोल व्हॉल्व्ह निखळल्यामुळे काही दिवस पंपिंग थांबवावे लागले होते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सोमवारी जायकवाडी धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले. सुमारे २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी प्रवाहित होऊ लागल्याने चाचणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वी शुक्रवारी पाणी शहराच्या वेशीपर्यंत पोहोचले होते; मात्र तांत्रिक बिघाडामुळे तीन दिवस काम ठप्प झाले होते. आता हा अडथळा दूर झाल्याने पुढील टप्प्यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात वेळेत पाणी पोहोचल्यास १ मेपासून पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो. मात्र, एकाच वेळी वाढीव २०० एमएलडी पाणी संपूर्ण शहरात वितरित करणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सुरुवातीला मर्यादित क्षेत्रातच पाणीपुरवठा होणार असून, नंतर हळूहळू विस्तार करण्यात येईल.
मुख्य जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी झाली का, या प्रश्नावर आयुक्तांनी सांगितले की अल्ट्रासॉनिक व रेडिएशन संबंधित चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत, कंत्राटदार कंपनीच्या मते या चाचण्या हायड्रॉलिक चाचणीइतक्याच प्रभावी आहेत. तथापि, याबाबत तांत्रिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
शहरातील खालील जलकुंभ महापालिकेच्या ताब्यात आले असून, या भागांमध्ये पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहेः शिवाजी ग्राउंड, टीव्ही सेंटर, हिमायत बाग, दिल्लीगेट, प्रतापनगर, हनुमान टेकडी (भूमिगत जलकुंभ) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीकडून हे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या क्षेत्रांपासूनच नव्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.






