सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : भाजप नेते व मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून व भाजप पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती, तर भारताचे तुकडे करण्याचे कारस्थान रचणाऱ्या सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली अत्यंत कठीण आणि आवश्यक मोहीम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही देशाच्या एकता व अखंडतेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. या मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांच्या त्यागाचा अवमान करण्याचे काम गिरीष महाजन करत आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाने भारतीय जनता पक्ष व रा. स्व. संघाची राष्ट्रविघातक प्रवृत्ती समोर आली आहे. इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबविले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजी यांना बलिदान द्यावे लागले त्यावरही महाजन शंका उपस्थित करतात हे अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
विशेष म्हणजे देशाचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या कारवाईशी संबंधित सुरक्षा मोहिमांमध्ये सहभागी होते. मग गिरीष महाजन त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार आहेत का? त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहेत का? त्यांच्यात ती हिंमत आहे का, असा सवाल सपकाळ यांनी केला.
भारतीय सैन्यदलाने देशाच्या अखंडतेसाठी राबविलेल्या मोहिमेची महंमद शाह अब्दालीशी तुलना करून गिरीष महाजन यांनी प्रत्यक्षात भारतीय सैन्यदलाचाच अपमान केला आहे. एवढेच नव्हे तर खलिस्तानी दहशतवादी जर्नैलसिंग भिंद्रनवाले याचे उदात्तीकरण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. देशाच्या सार्वभौमत्वाविरोधात शस्त्रे उगारणाऱ्या दहशतवाद्यांविषयी सहानुभूती निर्माण करणारी भूमिका घेणे अत्यंत गंभीर बाब आहे.
भिंद्रनवालेच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून देशाच्या एकता व अखंडतेच्या विरोधात वक्तव्य करणे हे राज्य सरकारचे अधिकृत धोरण आहे काय, याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरीष महाजन यांच्या भूमिकेशी सहमत आहेत का, याचे स्पष्ट उत्तर देशाला आणि महाराष्ट्राला द्यावे. जर ते गिरीष महाजन यांच्या वक्तव्याशी सहमत नसतील, तर त्यांनी सार्वजनिकपणे या वक्तव्याचा निषेध करून देशाची आणि भारतीय सैन्यदलाची माफी मागावी. अन्यथा गिरीष महाजन यांची भूमिका ही भाजपची अधिकृत भूमिका आहे असे समजले जाईल.
भाजपचे नेते मतांच्या राजकारणासाठी देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्याशी तडजोड करण्यास तयार असल्याचे त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे. भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा, देशासाठी बलिदान दिलेल्या नेतृत्वाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अवमान करणाऱ्या आपल्या वक्तव्याबद्दल गिरीष महाजन यांनी देशाची आणि भारतीय सैन्यदलाची तात्काळ माफी मागावी. तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.






