सौजन्य - नवराष्ट्र टीम
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. गुरुवारी (४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी येत असून निवडणुकीतून अर्ज माघारी घेतल्याच्या कारणावरून दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धण सपकाळ यांनी हि माहिती दिली आहे. साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल या काँग्रेस उमेदवारांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात १७ विधान परिषद मतदारसंघांसाठी १८ रोजी मतदान होणार आहे. आधी जागावाटपावरून आणि आता उमेदवारीवरून जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या. यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला.
मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे काँग्रेस पक्षाचे यवतमाळचे उमेदवार श्री. साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार श्री. शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षातून निलंबीत करण्यात येत असून त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द… pic.twitter.com/hDkQLVSPKH — Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 5, 2026
या दोन्ही जागांवरून काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठांना विश्वासात न घेता उमेदेवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हि मोठी कारवाई केली असून काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून त्यांनी याची माहिती दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काल उमेदवार अर्जमाघारी बाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ नाही तर ‘नॉमिनेशन सिस्टिम’ भाजपाला हवी आहे.”
ते पुढे म्हणाले, “विधान परिषदेच्या सध्या सुरु असलेल्या निवडणुकीचा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी असतात, हा मर्यादीत मतदार असतो. पण या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’, चा खेळ खुलेआमपणे सुरु आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी सत्ताधारी भाजपा महायुतीने सत्ता, पैसा या सर्व तंत्राचा गैरवापर केला आहे. घातपात, विश्वासघात, पैशाचे प्रचंड वाटप करण्यात आले आहे. या निवडणुकीला सत्ताधारी महायुती अत्यंत विकृत पद्धतीने सामोरे जात आहे, हे चित्र लोकशाहीसाठी अजिबात चांगले नाही,” अश्या शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीआधीच मविआला धक्का, १७ पैकी ५ जागांवर महायुती बिनविरोध






