"आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या...", डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव : जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती प्रक्रियेत भारतीय विद्यापीठांतून उत्तीर्ण झालेल्या वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. अशी आग्रही मागणी भीम पँथर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतीक सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि भारतातील अत्यंत कठीण परीक्षा पद्धती यांची तुलना करणे अन्यायकारक असून, स्थानिक गुणवत्तेला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.
डॉ. सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारतातील विद्यार्थी अत्यंत कठीण अशी ‘एनइइट’ परीक्षा उत्तीर्ण होऊन, गुणवत्तेच्या जोरावर शासकीय किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवतात. साडेपाच वर्षांचा कठोर अभ्यास आणि भारतातील कडक परीक्षा पद्धती पार करून ते ही पदवी संपादन करतात. याउलट, परदेशातील (एफएमजी) अनेक विद्यापीठांमधील परीक्षा पद्धती आणि गुणांकन पद्धती भारतातल्या तुलनेत अत्यंत वेगळी असते. केवळ गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी लावल्यास भारतीय पदवीधारकांवर मोठा अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अमेरिका, इंग्लंड यांसारखे प्रगत देश भारतीय डॉक्टरांना नोकरी देताना अत्यंत कठीण निकष आणि परीक्षा लावतात. मग आपल्याकडे स्थानिक पदवीधारकांऐवजी परदेशी पदवीधारकांना समान किंवा अधिक प्राधान्य देणे हे आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कष्टांची अवहेलना करणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
प्रथम प्राधान्य भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांतून वैद्यकीय एमबीबीएस पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात यावे. द्वितीय प्राधान्य भारतीय पदवीधारक बीएएमएस विद्यार्थ्यांना देण्यात यावे. तर तृतीय प्राधान्य परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात यावे. अशी मागणी करत, आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आणि स्थानिक गुणवत्तेला न्याय देण्यासाठी हे प्राधान्यक्रम ठरवण्याची मागणी भीम पँथर संघटनेने केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या 1,440 जागांसाठी मोठी भरती (२०२५) जाहीर करण्यात आली होती. यात एमबीबीएस (MBBS) किंवा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना अर्ज करता येईल। याशिवाय, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि मुंबई महानगरपालिकेतही कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रिया होती.
मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर






