६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव : तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये तब्बल ६ लाख ९५ हजार ३६५ रुपयांच्या निधीची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धाराशिव जिल्हा परिषदेचे एक कनिष्ठ अभियंता, एक उपअभियंत्यासह अन्य एकाचा समावेश आहे. यातील उपअभियंता हे मयत आहेत. तरीही गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.
ढोकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मन्मथ सुभाष आवटे (रा. कसबे तडवळे, ता. जि. धाराशिव), डी. के. पाटील (कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, धाराशिव, रा. काकडे प्लॉट) तसेच के. एन. साठे (उपअभियंता, बांधकाम विभाग जि.प. धाराशिव – मयत) यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
१४ जानेवारी २०२० ते ५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत ग्रामपंचायत कसबे तडवळे येथे मधुकर प्लॉटिंग परिसरात सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, रेल्वे स्टेशन परिसरातील सिमेंट रस्ता व नाली काम तसेच हावळे प्लॉटिंग येथे रस्ता व नाली बांधकाम करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण ६,९५,३६५ रुपये मंजूर करून घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम न करता निधीचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचायत समिती धाराशिव येथील विस्तार अधिकारी संजय संतराम ढाकणे यांनी १८ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून ढोकी पोलीस ठाण्यात कलम ४०९ (विश्वासघात), ४२० (फसवणूक), ४६७, ४६८ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्राचा वापर) आणि ३४ (सामूहिक हेतू) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नेते तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. भाजपकडून शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत, तानाजी सावंत यांना बाजूला ठेवून जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी रणनीती राबवली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेसंबंधी कोणतीही चर्चा करू नका, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे माहिती मिळाली आहे.






