चिपळूण : चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राबाहेरील मैदानावर सोमवारी सायंकाळी महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली. यावेळी उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी चिपळूण पुरात बुडालेले असताना माणसे मरत असताना सावर्डे येथे घेतलेल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री हे चिपळूणला वाचवायचे सोडून मुंबईला कसे परत जाता येईल. यासाठी प्रयत्न करीत होते. रस्ते बंद असल्याने शेवटी ते गोव्यामार्गे विमानाने मुंबईला गेले, असा गौप्यस्फोट करीत तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. उबाठा आणि त्यांच्या नेत्यांचे कारनामे जनतेसमोर आणले पाहिजेत, असे आवाहन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूणमधील महायुतीच्या प्रचार मेळाव्याप्रसंगी केले.
यावेळी केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे, आमदार शेखर निकम माजी आमदार सदानंद चव्हाण भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, भाजपा महिला मोर्चा चिटणीस निलम गोंधळी, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, भाजप चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक आशिष खातू, मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल चिपळूण तालुका अध्यक्ष समीर काझी, आरपीआयचे नेते दादा मर्चंडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, पंचायत समिती माजी सदस्य बाबू साळवी, खेर्डीचे माजी सरपंच दाभोळकर, माजी सभापती पूजा निकम आदी उपस्थित होते.
पुढे उदय सामंत म्हणाले की, प्रलयकारी पुरानंतर चिपळूण उभा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न गाळ उपसा, शहर सुशोभीकरणासाठी महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी चिपळूणसाठी दिलेला आहे. चिपळूणच्या दृष्टीने पूररेषेचा जाचक प्रश्न आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्राण्यांच्या माध्यमातून आपण कायमचा सोडवू. त्याचबरोबर राणेंना चिपळूणने रत्नागिरीपेक्षा अधिक मताधिक्य दिले. तर जिल्हा नियोजन समिती रत्नागिरीपेक्षा चिपळूणला अधिक देऊ, अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी आमदार शेखर निकम यांना यावेळी दिली.
चिपळूण-संगमेश्वरमधून आम्ही एकजुटीने मताधिक्य मिळवून देऊ – आ. शेखर निकम
आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरास मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून राबविलेला विकास कार्यक्रम सर्वांसमोर ठेवताना शहराच्या दृष्टीने वाशिष्टी नदी सुधार कार्यक्रमाला ही चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर रत्नागिरीपेक्षा जास्त मताधिक्य आम्ही या मतदारसंघातून राणेंना देऊ अशी ग्वाही दिली. तर खेर्डी येथील एका सभेत आघाडीच्या नेत्यांनी आम्ही खेर्डीतून ७० टक्के मतदान राऊत यांना देऊ असे म्हटले आहेत. मात्र, आम्हीच पाहतो की तुम्ही ७० टक्के मतदान कसे देतात ते असे आव्हानच त्या नेत्याला निकम यांनी यावेळी दिले. जेवढी तुम्ही आमच्यावर टीका कराल तेवढे मताधिक्य आम्ही राणेंना मिळवून देऊ, असा टोलाच विरोधी नेत्यांना हाणला. विरोधक संविधान बदलाची चुकीची माहिती लोकांना देत आहेत. मात्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना कोणीही बदलू शकणार नाही, असा विश्वास उपस्थित जनतेला आ. निकम यांनी यावेळी दिला.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या कणखर नेतृत्वाची गरज – माजी आमदार सदानंद चव्हाण
शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात कोकणातून राणे यांना मोठे मताधिक्य देऊन पाठवणे आवश्यक आहे. महायुतीच्या माध्यमातून चार लोकसभा निवडणुकांचा आपल्याला अनुभव असल्याने या मतदारसंघातून आमदार शेखर निकम आणि आम्ही सारे एकजुटीने प्रयत्न करून मोठे मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला. या सभेचे सूत्रसंचालन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे व मंदार कदम यांनी केले.