मुंबई – शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या कबीर कला मंचच्या सदस्या ज्योती जगताप यांच्याविरोधातील आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. त्याचा पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात सहभाग असल्याचा आरोप करत दिल्ली विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक हानी बाबू आणि कबीर कला मंच या सांस्कृतिक गटाचे तीन सदस्य सागर गोरखे, रमेश गायचोर आणि जगताप यांना अटक करण्यात आली होती. आरोपी मिलिंद तेलतुंबडेने कबीर कला मंचच्या तीन सदस्यांशी चर्चा केली होती. तसेच या तिघांनी अन्य व्यक्तींच्या मदतीने कार्यक्रमात माओवादी विचारसरणीचा प्रसार केल्याचा आरोप एनआयएने केला होता.
या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानचे न्या. दिनेश ई कोथळीकर यांनी फेब्रुवारी महिन्यात जगताप यांच्यासह अन्य चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्या आदेशाला जगताप यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्या. अजय एस गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जगताप यांच्यावर ठेवलेल्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने जगताप यांची नियमित जामिनाची याचिका फेटाळून लावली.