माझ्याकडे दैवी शक्ती आहे, कर्करोगासारख्या गंभीर आजारांना मंत्राने बरे करतो, ज्या महिलांना मूल होत नाही अशा महिलांना मूल देतो, घरातल्या सर्व समस्या मंत्रोच्चाराने दूर करतो असे सांगून सामान्य जनतेची आणि महिलांची आर्थिक फसवणूक करत जनतेला वेठीस धरणारा वडगावपान (ता. संगमनेर) येथील दत्तधाम सरकार दरबारचा तथाकथित भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यासह तिघांना काल रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भोंदू बाबा गडगे यास आज कोर्टासमोर उभे केले असता सहा दिवसांची २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दत्ताधाम आश्रमातील डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (दोघे रा. वडगाव पान), सुरज शंदे व मधुकर शिदे (दोघे रा. रहिमपूर ता. संगमनेर) अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज ॲन्ड मॅजिक रेमेडी ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट, बनावट व्हिडिओ तयार करून व्हायरल करणे आदी गंभीर कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तधाम सरकारचा भोंदू महाराज गडगे व त्याचा साथीदार मधुकर शिंदे या दोघांना बेड्या ठोकून गजाआड करण्यात आले आहे, उर्वरित तिघेजण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या गंभीर प्रकाराची अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली होती. भोंदूबाबावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच दत्तधाम दरबार बंद करावा अशी मागणी अंनिसच्या राज्य सचिव ॲड, रंजना गवांदे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली होती.
मात्र तक्रार देण्यास भक्तगण पुढे येत नसल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब होत होता. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन गडगेबाबाचा भंडाफोड केला.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान आणि मनोली गावाच्या शिवावर दत्तधाम सरकार या नावाने गेली अनेक वर्षापासून दरबार भरवला जातो. मंत्रोच्चार व कथित चमत्काराने शारीरिक दुर्धर असणारे आजार बरे करण्याचे काम गडगेबाबा करतात, असे दत्तधाम युट्युब चॅनेलद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात येत असे. घरातल्या सर्व समस्या मंत्रोच्चाराने दूर करतो असे सांगून सामान्य लोकांकडून ११ हजार, २१ हजार आणि ५१ हजार अशा रकमा घेऊन भक्तांची लूट करत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
वडगाव पान येथील दत्तधाम सरकार या आश्रमावर महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला. या छाप्यात मीटरला बायपास करून सुमारे ७ किलोवॅटची वीज चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. चीजचोरी करणाऱ्याऱ्यांना दंडात्मक बिल दिले जाईल. ते भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाईल. सात दिवसांत दंडाची रक्कम भरली नाही, तर महावितरणमार्फत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी दिली.






