वाईत ‘पारदर्शक कारभार’ की कागदोपत्री स्वच्छता? ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी
वाई : वाई शहरातील नुकतीच पार पडलेली नगराध्यक्ष निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची ठरली. वाईकर नागरिकांना अपेक्षा होती की नव्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता आणि सुशासनाचा नवा अध्याय सुरू होईल. मात्र आज वास्तव पूर्णतः वेगळे असल्याचे चित्र शहरात उघड झाले आहे. ब्राह्मणशाही परिसरात ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक आणि गुलाबराव खामकर पथ या मार्गावर गटारे तुंबून सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहताना दिसत आहे.
अनेक दिवस गटारांची प्रत्यक्ष साफसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. दोन महिन्यांपूर्वी साफसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र नागरिकांच्या मते ती साफसफाई केवळ कागदोपत्रीच झाली. गटारांमध्ये वाळूचे ढीग साचलेले असून प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचऱ्यामुळे नाले पूर्णपणे चोकअप होत आहेत. परिणामी दोन-तीन दिवसांतून कधीही गटाराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर सांडते. दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे वाई नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विविध प्रभागांतून निवडून आलेल्या नगरसेवकांचेही याकडे लक्ष नसल्याची चर्चा आहे. किसनवीर कॉलेज रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात.
शहरातील अनेक भागांत “रस्त्यात गटार की गटारात रस्ता?” अशी अवस्था झाली आहे. नवीन नगराध्यक्षांनी “पारदर्शी कारभार” करण्याचा दावा केला आहे. मात्र फक्त ऑनलाईन नगरपरिषद बैठका घेऊन शहर स्वच्छ होणार का? असा सवाल काही नागरिक दबक्या आवाजात उपस्थित करत आहेत. प्रत्यक्ष कामापेक्षा कागदोपत्री अहवालांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका होत आहे. तर काही ठिकाणी नळ कनेक्शन साठी मधोमध रस्ता घालून त्या ठिकाणी मातीचे ढीग तसेच लावले जातात कधीही कोठेही अपघात होऊ शकतो परंतु नगर परिषदेचे कामगार मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ढिग तसेच लावतात वाई शहराची स्वच्छता ही फक्त अहवालांपुरतीच मर्यादित आहे का? “अच्छे दिन” येतील या अपेक्षेने ब्राह्मणशाही परिसरातील मत दिलेल्या नागरिकांना अजूनही दुर्गंधी, सांडपाणी आणि कचऱ्याचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने गटारांची प्रत्यक्ष साफसफाई, नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाईकरांना आश्वासन नव्हे, तर कृती हवी आहे.






